सिमला – अलिकडेच हिमाचल (Himachal) प्रदेशात आलेल्या पूर आणि भूस्खलनामुळे राज्यातील सामान्य जनजीवन आणि पर्यटन व्यवस्था पुर्ण विस्कळीत झाली होती. परंतु आता येथील स्थिती वेगाने सामान्य झाली असून राज्य सरकारनेही पर्यटकांना पुन्हा हिमाचलात येण्याचे निमंत्रण दिले आहे. ग्रामीण विकास मंत्री अनिरुद्ध सिंह यांनी पर्यटकांना हे निमंत्रण दिले आहे.
रविवारी एएनआयशी बोलताना अनिरुद्ध सिंह म्हणाले की, तीव्र पाऊस आणि पुरामुळे राज्याचे 10,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे 20,000 कोटींहून अधिक नुकसान झाले आहे.
6500 हून अधिक घरे पूर्णपणे उद्वस्त झाली आहेत. राज्य सरकार स्थानिक आणि खाजगी नुकसानीचे मूल्यांकन करत आहे. तथापि सर्व रस्ते पूर्ववत करण्यात आले आहेत; ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत आणि ज्यांची घरे गेली आहेत.
त्यांच्या ग्रामीण आणि शहरी भागातील घरांचे भाडे सरकार देईल. आम्ही आपत्ती निधीतून प्रत्येकी 1 लाख रुपये दिले आहेत. ज्यांचे अंशत: नुकसान आहे त्यांना मनरेगा अंतर्गत 30 कोटी रुपये राज्य सरकारने दिले आहेत, तर 6551 घरांसाठी केंद्र सरकार निधी देणार आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांनाही निधी वाढवण्याची विनंती केली आहे, असे मंत्र्यांनी सांगितले.
ते म्हणाले की आता या राज्यांतील विविध घटकांचे संपूर्ण लक्ष पर्यटन व्यवसायाच्या पुनरुज्जीवनावर लागून राहिले आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आम्ही विविध योजना आखत आहोत.
त्या अंतर्गत आम्ही एक पॅराग्लायडिंग साइट सुरू करीत सरकारच्या सहकार्याने पर्यटन महोत्सवाचे आयोजन करत आहोत. आम्ही पर्यटन विभागाच्या सहकार्याने फ्लाइंग फेस्टिव्हलचे आयोजन करणार आहोत. हा महोत्सव 12 ते 15 ऑक्टोबर या तारखेदरम्यान होणार आहे.