नवी दिल्ली: भारत आणि युएई म्हणजेच संयुक्त अरब अमिराती दरम्यान गुंतवणुकीचा आढावा घेण्यासाठी नेमण्यात आलेल्या उच्चस्तरीय संयुक्त कृतीगटाची सातवी बैठक काल अबू धाबी येथे झाली. दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. अबू धाबी गुंतवणूक प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक शेख हमीद बिन झायेद अल नहायन आणि वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी संयुक्तरित्या या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले.
जानेवारी 2017 मध्ये अबू धाबीचे राजपूत्र शेख मोहम्मद बिन झायेद अल नहायन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात उभय देशात सर्वसमावेशक राजनैतिक भागीदारी संदर्भात करार करण्यात आला होता. या कराराच्या अंमलबजावणीसाठी हा कृती गट स्थापन करण्यात आला आहे.
कृती गटाच्या सातव्या बैठकीत द्विपक्षीय संबंध आणि गुंतवणुकीबाबत दोन्ही देशांनी केलेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले तसेच आदिया या युएईच्या कंपनीच्या कराबाबत यावेळी चर्चा झाली. या कंपनीवर लावल्या जाणाऱ्या करासंदर्भात दोन्ही देशांना सोयीचे ठरेल असा तोडगा काढण्याचे आश्वासन गोयल यांनी दिले. त्याशिवाय नागरी विमान वाहतूक क्षेत्रातल्या काही अडचणींविषयी देखील या बैठकीत चर्चा झाली. दोन्ही देशांमधल्या व्यापारी समुदायांमध्ये विश्वास निर्माण व्हावा या दृष्टीने द्विपक्षीय न्यायिक सहकार्याची गरज आहे यावर दोन्ही देशांनी भर दिली.