प्रशांत जाधव
भाजप जोशात, सेना संभ्रमात तर कॉंग्रेस निद्रावस्थेत
पवारांच्या दौऱ्याने राष्ट्रवादीच्या गोटात चैतन्य
सातारा – भाजप- शिवसेना युतीची घोषणा कधी होणार, याकडे जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांतील भाजप शिवसेनेच्या इच्छुकांच्या नजरा लागल्या आहेत. युती तुटल्यास इच्छुकांच्या आकांक्षांना बळ मिळणार आहे तर युती झाल्यास दोन्ही पक्षांतील अनेकांना गप्प बसावे लागणार आहे, तसे न झाल्यास जिल्ह्यात बंडखोरी अटळ आहे. सध्या जिल्ह्यात भाजप जोशात आहे तर सेना अजूनही संभ्रमात, कॉंग्रेस निद्रावस्थेत असल्याचे दिसून येत आहे. तर रविवारी शरद पवारांनी केलेल्या दौऱ्याने राष्ट्रवादीच्या गोटात चैतन्य आल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात 2014 मध्ये भाजप, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी या चार पक्षांचे उमेवार आमनेसामने आले होते. त्यावेळी जिल्ह्यात हाय होल्टेज लढतीही झाल्या होत्या. मात्र, यावेळी आचारसंहिता लागली तरी राज्यातील या चार प्रमुख पक्षांच्या जागा वाटपावर अद्याप निर्णय झाला नसल्याने इच्छुकांच्या पोटात गोळा यायला लागला आहे.
सध्या सुरु असलेला घरोघरी प्रचार हा पक्षाच्या चिन्हासह करायचा की स्वतंत्र हा प्रश्न पडल्याने इच्छुकांच्या नजरा मुबंईतील निर्णयाकडे लागल्या आहेत. 2014 मध्ये जिल्ह्यात वेगवगेळे लढलेल्या या पक्षांच्या उमेवारांनी यावर्षीही मतदारसंघाच्या उमेदवारीवर हक्क सांगितल्याने तर भाजपत, सेनेत नव्याने दाखल झालेल्या नेत्यांमुळे यावर्षी जिल्ह्यात युती- अघाडी झाली तरी अन् झाली नाही तरी बंडखोरी अटळ आहे. 2014 मध्ये साताऱ्याची जागा राष्ट्रवादीने राखली होती. साताऱ्यातून माजी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याविरोधात भाजपकडून दीपक पवार यांनी लढत दिली होती. त्या लढतीत भोसले यांनी पवारांचा तब्बल 47813 मतांनी पराभव केला होता. वाई मतदारसंघसुद्धा राष्ट्रवादीने राखत आ. मकरंद पाटील यांनी कॉंग्रेसचे मदन भोसले यांचा 38702 मतांनी पराभव केला होता. फलटणमधून राष्ट्रवादीच्या दीपक चव्हाण यांनी कॉंग्रेसच्या दिगंबर आगवणे यांचा 33586 मतांनी पराभव केला.
कोरेगावमधून राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांनी कॉंग्रेसच्या विजय कणसे यांचा 47274 मतांनी पराभव केला होता. माणमध्ये जयकुमार गोरे यांनी रासपचे शेखर गोरे यांचा 23351 मतांनी पराभव केला होता. कराड उत्तरमधून राष्ट्रवादीच्या बाळासाहेब पाटील यांनी कॉंग्रेसच्या धैर्यशील कदम यांचा 20507 मतांनी पराभव केला. कराड दक्षिणमधून कॉंग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांनी अपक्ष विलासकाका पाटील यांचा 16418 मतांनी पराभव केला होता.
पाटणमधून शिवसेनेच्या शंभूराज देसाई यांनी सत्यजीत पाटणकर यांच्यावर 18824 मतांधिक्य मिळवत विजय नोंदविला. एंकदरीत 2014 ची विधानसभा कॉंग्रेस व राष्ट्रवादी या दोन पक्षांच्या उमेदवारांच्यात झाल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते. मात्र, त्यानंतर राज्याच्या व देशाच्या राजकारणात भाजपने मारलेली मुसंडी अन् त्यानंतर गेल्या तीन महिन्यांत विरोधी पक्षांना लागलेली गळती पाहता त्याचे परिणाम जिल्ह्याच्या राजकारणावर दिसून येतील. कारण साताऱ्यातून उमेद्वार तेच आहेत फक्त पक्ष बदलला असल्याने युती, आघाडी झाली अथवा नाही तरी त्याच जुन्या प्रतिस्पर्ध्यांच्यात खरी लढत होईल. वाईमध्ये आ. मकरंद पाटील यांच्याविरोधात युती, आघाडी झाल्यास मदन भोसले यांचे भाजपकडून तर न युती, आघाडी न झाल्यास भोसले यांच्यासोबत सेनेचे पुरूषोत्तम जाधव, कॉंग्रेसकडून विराज शिंदे यांचे आव्हान असेल.
फलटण मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार अजून ठरला नसला तरी रामराजे व रणजितसिंह नाईक निंबाळकर या दोन गटांत लढत होईल. या मतदारसंघात युती, आघाडी न झाल्यास शिवसेनेचेही आवाहन असेल मात्र, कॉंग्रेसला उमेदवार शोधावा लागेल. कोरेगावमध्ये शशिकांत शिंदे व भाजपचे महेश शिंदे यांच्यात लढत होईल. मात्र, युती, आघाडी न झाल्यास शिवसेनेकडून रणजित भोसले तर कॉंग्रेसकडून विजय कणसे यांची उमेदवारी असेल.
माण मतदारसंघात भाजपचे जयकुमार गोरे यांना पक्षीय विरोधक राहिला नसल्याचे दिसून येते. युती, आघाडी न झाल्यास त्यांना शिवसेनेचे शेखर गोरे हेच तगडे आव्हान देतील. माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर “आमचं ठरलयं’ मधून तिसरा पर्याय म्हणून समोर येतील. कारण राष्ट्रवादीच्या प्रभाकर देशमुख, प्रभाकर घार्गे याच्याबाबतीत पक्ष निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. कराड उत्तरमधून बाळासाहेब पाटील यांना भाजपचे मनोज घोरपडे यांचे आव्हान असेल, या मतदारसंघात युती, आघाडी न झाल्यास धैर्यशील कदम पर्याय म्हणून पुढे येथील.
कराड दक्षिणमधून कॉंग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांना भाजपचे अतुल भोसले टक्कर देतील, युती, आघाडी न झाल्यास राष्ट्रवादीकडून अविनाश मोहिते लढत देतील. तसेच विलासकाकांचे पुत्र उदयसिंह पाटील यांचा निर्णयही युतीच्या निर्णयावर अवलंबून आहे. पाटण मतदारसंघातून देसाई पाटणकर यांच्यात काटे की टक्कर होईल, युती, आघाडी न झाल्यास कॉंग्रेसकडून हिंदूराव पाटील यांची उमेदवारी पुढे आल्यास नवल वाटायला नको. जिल्ह्यात 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या स्थानी असलेल्या भाजपने सातारा, माण, कराड उत्तर, कराड दक्षिण, वाई या
मतदारसंघात कमळ फुलवण्यासाठी चंग बांधला आहे.