हवामान विभागाचे संकेत : पुण्यात भर दुपारीच अंधार
पुणे – किनारपट्टी आणि घाट माथ्यावर निर्माण झालेले ढगांचे आवरण, बंगालच्या उपसागरातून निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रुपांतर चक्रावातमध्ये झाल्याने पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात येत्या चोवीस तासांत अतिवृष्टीचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत.
राज्यात सध्या सर्वत्र पावसाचा जोर वाढला आहे. गणेशोत्सवानंतर मध्य भारतात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता निवळल्यानंतर राज्यात पावसाचा जोर कमी होईल, असे वाटत होते. पण त्यातच पश्चिम किनारपट्टीवर ढगांची गर्दी झाली. त्याच दरम्यान, बंगालच्या उपसागरात ही कमी दाबाच्या क्षेत्र निर्माण होऊन ते चक्रावातमध्ये रुपांतर झाल्याने त्या वाऱ्याच्या जोरामुळे या पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यात येत्या दोन ते तीन दिवसांत मुसळधार पाऊस पडणार आहे. विशेष करुन मुंबई-कोकणासह घाट माथ्यावर अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहेत.
दरम्यान, पुणे शहरातही बुधवारी सायंकाळी 4 वाजेपासून आकाशात ढग दाटून आले होते. शहरात अंधार पडल्यासारखे वातावरण होते. त्यातच पावसाचा जोरही वाढला होता. हीच स्थिती पश्चिम महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी होती. मराठवाडा आणि विदर्भातही पावसाच्या सरी कोसळत आहेत.