नागरिक वरुणराजाच्या दहशतीखाली : ३९ गावांतील पिकांना मोठा फटका
राजगुरूनगर – खेड तालुक्यातील वाफगाव परिसरात रविवारी (दि. 3) सायंकाळनंतर ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, गेल्या 15 ते 20 दिवसांपूर्वी सुरू झालेला परतीच्या पावसाने खेड तालुक्यात हाहाकार माजवला आहे. हा ढगफुटीसदृश अवकाळी दररोज कोणत्या ना कोणत्या गावात धडक देत असल्याने खेड तालुक्यातील जनतेच्या मनात पावसाची दहशत बसली आहे. तर 190 महसुली गावांपैकी 39 गावात अवकाळी पावसाचा पिकांना मोठा फटका बसला आहे.
खेड तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे भात, सोयाबीन, ऊस, मका व बटाटा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पाऊस अजूनही थांबत नाही, त्यामुळे नुकसानीत अजूनच वाढ होत आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता सरकारने आर्थिक मदतीची तरतूद केली आहे, त्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतातील हाताशी आलेली पिके पावसाने वाया गेली त्याचे पंचनामे करण्यात येत आहेत. कृषी महसूल विभागाच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन अधिकारी पाहणी करून पंचनामे करीत आहेत.
राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे व वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांनी रविवारी (दि. 3) तालुक्यातील काही गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे व अहवाल महसूल विभागाकडे तत्काळ सादर करण्याचे आदेश दिले. गेल्या 50 वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद या ठिकाणी झाली आहे. यामुळे तालुक्यातील अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या गावांच्या व पीक क्षेत्रात वाढ होणार आहे. त्या भागातील पीक व शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून करून नुकसानभरपाई मिळण्याची मागणी होत आहे.
खेड तालुक्यात सुमारे 39 गावांतील 1448 हेक्टर क्षेत्राचे अंदाजानुसार नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या 397 शेतकऱ्यांच्या 127.99 हेक्टर शेतातील पिकांचे आतापर्यंत पंचनामे करून वरिष्ठांकडे अहवाल पाठविण्यात आला आहे. नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक असे सुमारे 600 कर्मचारी नियुक्त केले आहेत. – सुचित्रा आमले, तहसीलदार