प्राथमिकस्तरावर 10 हजार कोटींची तरतूद
पुणे – अतिवृष्टीने बाधित झालेल्या सर्वच पिकांचे पंचनामे करण्यात येत असून संबंधित विभागांना तसेच आदेश दिले आहेत. प्राथमिकस्तरावर 10 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. उर्वरित मदत केंद्र सरकारकडे मागणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
पुरंदर तहसील कार्यालयात पुरंदर, बारामती, इंदापूर येथील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, दादासाहेब कांबळे, तहसीलदार रुपाली सरनोबत, सोनाली मेटकरी, विजय पाटील आदी उपस्थित होते.
हे शेतकऱ्यांचे सरकार असल्याने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. बाधित क्षेत्रांचे पंचनामे तत्काळ करण्यात यावे, आवश्यकता भासल्यास पंचनाम्याची पथके वाढविण्यात यावीत. 6 नोव्हेंबरपर्यंत पंचनामे पूर्ण करा, असेही पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.
पालकमंत्री पाटील यांनी सोमवारी पुरंदर तालुक्यातील भिवरी, बोपदेव, चांबळी, हिवरे येथील अतिवृष्टीनेग्रस्त भागांची पाहणी करून शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.