दोन-तीन दिवसांपूर्वीच माझ्या एका मित्राने त्यांच्या वडिलांना माझ्याकडे ऍडमिट केले. ज्या वेळेला त्यांना ऍडमिट केले त्यावेळेला त्यांची परिस्थिती अशी होती की, त्यांना अंथरुणावरून उठताही येत नव्हते. त्यांनी मला सांगितले की, अगदी 15 दिवसांपूर्वीपर्यंत ते हळूहळू का होईना चालत फिरत होते. त्यांची छोटी-मोठी कामे ते स्वत:च करीत होते. जुलाब-उलटीचे छोटेसे निमित्त झाले आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागले. त्यानंतर त्यांची स्वतःची चालणं-फिरण्याची ताकद एकदमच कमी झाली.
अशा पद्धतीचे अनुभव आजूबाजूंच्या वृद्धांबाबत आपणा सर्वांनाच येत असतात. आपल्याला हे कळतच नाही. अगदी आतापर्यंत ही वृद्ध व्यक्ती चालू फिरू शकत होती आणि स्वतःची कामे स्वतः करू शकत होती, तर एका छोट्याशा घटनेने मग तो आजार असो किंवा मानसिक आघात असो असे काय घडते की, ज्यामुळे त्यांची पूर्ण ताकद ते हरवून बसतात. हेच बहुतेक वेळा सर्वसामान्यांना कळत नाही.
ही जी परिस्थिती असते त्याला वृद्धशास्त्रामध्ये Frailty म्हणजे “वृद्धावस्थेतील दुर्बलता’ असे म्हणतात. इथे आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की, आपल्याला आयुष्यात कोणत्या ना कोणत्या आजारामुळे अशी दुर्बलता म्हणजे अशक्तपणा येतच असतो. पण हा अशक्तपणा आणि वृद्धावस्थेमध्ये येणारी ही दुर्बलता यांच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. तरुण मंडळी आजारी पडली तर त्या आजारपणाचा शारीरिक अथवा मानसिक ताण नसतो. त्या ताणातून पूर्णतः बरी होण्याची क्षमता तरुण मंडळी ठेवून असतात. वृद्ध माणसांच्या बाबतीत असे घडताना दिसत नाही. एखादा छोटासा आघात मग तो ऑपरेशन असो, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होणे असो, एखादे इन्फेक्शन असो किंवा मानसिक आघात असो, त्यानेदेखील ही मंडळी शारीरिकरित्या एकदमच दुर्बल होतात.
आपण बोलीभाषेमध्ये तरुण रक्त आहे किंवा उसळते रक्त आहे, गरम रक्त आहे असे शब्दप्रयोग नेहमीच वापरतो. रक्त तरुण असणे किंवा शरीरात ताकद असणे याची उत्तम चाचणी कधी होते तर एखादी व्यक्ती आजारपण कशा पद्धतीने पेलू शकते यावरून! म्हणजेच गेल्या काळात असे लक्षात आले की, अनेक तरुण मंडळींना करोना होऊन गेला; पण कळलादेखील नाही. त्यांना कोणतीही लक्षणं जाणवली नाही. काही मंडळींना करोना झाला; पण त्यांना घरच्या घरी छोटी-मोठी ट्रीटमेंट घेऊन बरं होता आलं. दुसरीकडे वृद्धांना मात्र मोठ्या प्रमाणात ऍडमिट व्हावे लागले. ऑक्सिजनसारखी गुंतागुंतीची ट्रीटमेंट करावी लागली किंवा त्यांचे प्राणही गेले. जे आजारपण तरुणांमध्ये फारसे इफेक्ट दाखवू शकले नाही; त्याने वृद्धांचा मात्र जीव घेतला. हे कशामुळे घडले तर तरुणांमध्ये प्रतिकारशक्ती आणि निरनिराळ्या संस्थांची काम करण्याची ताकद ही मुळातच थोडीशी जास्त असते. एका अर्थाने या प्रतिकारशक्तीला किंवा शारीरिक ताकदीला आपण गंगाजळी म्हणूयात. ही शारीरिक ताकद म्हणजे स्नायूंमधील ताकद या अर्थाने आपण म्हणत नाही आहोत. ही शारीरिक ताकद दुखण्याला आजारपणाला किंवा ताण-तणावाच्या मनोशारीरिक परिस्थितीला तोंड देण्याची ताकद या अर्थाने बोलत आहोत.
ही जी ताकद आहे ही वृद्धावस्थेत खूपच कमी होत जाते. म्हणजेच शारीरिक शरीरक्रियांची ताकद त्यांची गंगाजळी वृद्धांच्या बाबतीत थोडी कमी झालेली दिसते. त्यामुळे हे आघात ते सहन करू शकत नाही. अगदीच उदाहरण घ्यायचे ठरवले तर तरुणांच्या आर्थिक परिस्थितीचे घेऊया ना! करोनामुळे ज्या लोकांकडे मुळातच पैसे किंवा आर्थिक गंगाजळी भरपूर होती अशी मंडळी काम गेले तरीसुद्धा एक-दोन वर्षे आरामात काढू शकली. कारण त्यांच्याकडे आर्थिक गंगाजळी होती. पण ज्यांच्याकडे मुळातच आर्थिक ताकद कमी आहे अशी मंडळी आर्थिकदृष्ट्या पार कोलमडून पडली. म्हणजेच गंगाजळी महत्त्वाची! ही जी आर्थिक गंगाजळी आहे. तशीच शारीरिक क्षमतेच्या बाबतीत ही आपण जी गंगाजळी म्हणत आहोत त्याला वैद्यकीय भाषेत “फिजिओलॉजिकल रिझर्व्ह’ असे म्हणतात. फिजिओलॉजिकल रिझर्व्ह जितका जास्त तितका त्या व्यक्तीचे आजारपणाला तोंड देण्याची क्षमता जास्त आणि फिजिओलॉजिकल रिझर्व्ह जितका कमी तेवढीच आघाताला किंवा ताणतणावाला तोंड देण्याची क्षमता कमी, असे म्हणता येईल.
सर्वसाधारणपणे आपण आजारांकडे कशा पद्धतीने बघतो किंवा त्याचे उपचार कशा पद्धतीने करतो? तर डॉक्टर आपल्याला तपासतात, तपासण्या करायला सांगतात आणि त्यावरून आजाराचे निदान करतात. त्यावरून औषधोपचार करतात आणि आपण बरेही होतो, ही झाली सर्वसाधारण पद्धत. म्हणजेच तपासणीमध्ये आणि बाहेरून रक्त, लघवीच्या तपासण्या करून किंवा सिटीस्कॅन गोष्टींवरून रोगाचे निदान केले की उपचार कोणते? हे निश्चित होत असते. पण जेव्हा वृद्ध दुर्बल असतात, त्यांच्यामध्ये सहसा तपासण्या नॉर्मल येतात, डॉक्टरांना तपासण्यांमधून फारसे काही निदान लागत नाही आणि डॉक्टरही वयानुसार आता व्हायचेच असे म्हणून सोडून देतात आणि वृद्ध स्वतःच्या वयाला दोष देत बसतात. इथे लक्षात घ्यायला पाहिजे की, हे सगळे ज्या दुर्बलतेमुळे होते ती नुसती दुर्बलता नसून अनेक शारीरिक, मानसिक आणि शरीरातील पेशींच्या पातळीवरील होणाऱ्या बदलामुळे ही परिस्थिती होत असते. त्या अर्थाने हा एक लक्षणसमुच्चय म्हणजेच सिंड्रोम आहे आणि त्याचे निदान आपण वेळोवेळी करू शकलो तर वृद्धावस्थेतील दुर्बलतेला, कमजोरीला उत्तमरीत्या तोंड देता येते. भविष्यात अंथरुणाला खेळून राहणे आपणास टाळता येते ते कसं? ते आपण पुढील भागात नक्की वाचूया.
(क्रमशः)