जास्तीत जास्त लोकांनी ऍपचा वापर करण्याचे आवाहन
पुणे – करोना व्हायरसचा भारतातील जनतेला मुकाबला करता यावा यासाठी केंद्र सरकारने आरोग्य सेतू नावाचे ऍप सुरू केले आहे. यामुळे करोना व्हायरसचा रुग्ण नजीकच्या परिसरात आल्याची माहिती मिळते. गेल्या 13 दिवसांमध्ये भारतातील तब्बल 5 कोटी लोकांनी हे ऍप डाऊनलोड केले आहे. त्यामुळे हे ऍप जगात सर्वात वेगाने वाढणारे ऍप ठरले आहे, असे नीती आयोगाने म्हटले आहे.
नीती आयोगाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, टेलिफोन 5 कोटी लोकापर्यंत जाण्यास 75 वर्षे लागली, रेडिओ 5 कोटी लोकांपर्यंत जाण्यास 38 वर्षे लागली, टेलिव्हिजन 5 कोटी लोकांपर्यंत जाण्यास 13 वर्षे लागली, इंटरनेट 5 कोटी लोकांपर्यंत जाण्यास 4 वर्षे लागली, फेसबूक 5 कोटी लोकांपर्यंत जाण्यास 19 महिने लागले, पोकेमॉन 5 कोटी लोकांपर्यंत जाण्यास 19 दिवस लागले तर आरोग्य सेतू 5 कोटी लोकापर्यंत जाण्यास केवळ 13 दिवस लागले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात या ऍपचा उल्लेख केला होता. हे ऍप आपल्या मोबाइल फोनमध्ये डाऊनलोड केल्यानंतर आपल्या नजीकच्या परिसरामध्ये कोणी करोनाचा रुग्ण असल्यास त्यापासून स्वतःचा बचाव करण्यास मदत होते. पंतप्रधान कार्यालय, नीती आयोग आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सहकार्याने हे ऍप विकसित करण्यात आले आहे. या ऍपमध्ये आणखी सुधारणा करण्याबाबत टीसीएस, टेक महिंद्रा या कंपन्या प्रयत्न करीत आहेत. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग आणि डेटा सायन्सचा वापर करण्यात येत आहे.