करोना विषाणूला मारू शकणारा बाण कोणाच्याच भात्यात नाही. तो नजीकच्या काळात मिळण्याचीही शक्यता नाही. संपूर्ण जगच अंधारात चाचपडण्याचा अनुभव घेत आहे. जेव्हा उत्तर नसते, तेव्हा प्रश्न फार असतात. जेव्हा प्रश्न अधिक असतात तेव्हा सल्ले आणि सल्लागारही भरपूर असतात. कोणता सल्ला लागू पडला त्याचा सोक्षमोक्ष लागेपर्यंत धीर धरण्याची तसदीही घ्यायची नसते. त्यामुळे होते काय, किचकट विषयाचा आणि गंभीर समस्येचा गुंता वाढतच जातो. करोनाने अद्याप बाकी काही शिकवले नसले तरी सल्लागार मात्र भरपूर दिले.
सोशल मीडियावरच्या नाक्यावर गप्पा झोडणाऱ्यांपासून माननीय न्यायालयांपर्यंत सगळीकडे सल्लेवजा सूचनांचे पीक आले आहे. यात अर्थातच सरकार नामक यंत्रणा भरडली जात आहे. सरकारबद्दल सॉफ्ट कॉर्नर नाही. तसा चुकीच्या ठिकाणी तो बाळगण्याची आवश्यकताही नाही. मात्र, सरकार म्हणून किंवा एकदा सरकारकडे चेंडू टोलवला की सगळे कसे मोकळे होता येते. पण हे सगळे होत असताना आपल्याही जबाबदारीचे भान सुटते आहे याचेही भान राहात नाही.
“लॉकडाऊन 5′ सुरू आहे. ते करत असतानाच “अनलॉक’ही करण्यात आले आहे. त्याचाही पहिला टप्पा लागू झाला आहे. 1 जूनपासून बऱ्यापैकी शिथिलता प्राप्त झाली आहे. त्यामुळे अनेक व्यवहार सुरू झाले आहेत. व्यवहार सुरू झाले म्हणजे करोना हद्दपार झाल्याचा समजही करून घेतला आहे. त्यामुळे गर्दीला आता शिस्त आणि जबाबदारीचे सोयरसूतक राहिलेले नाही. बाधितांचा आकडाही वेगात वाढतो आहे. फक्त 11 दिवसांत लाखभर लोक करोनाग्रस्त झाले आहेत. सरकार म्हणते अद्याप समूह संसर्ग सुरू झालेला नाही. याचा आनंद मानावा तर रोज दहा हजार नवे रुग्ण सापडत आहेत, त्याचे काय हा प्रश्नच.
लक्षणे असलेले आणि नसलेले हाही आणखी एक मुद्दा. 80 टक्के लोकांना लक्षणेच नाहीत. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, असे काहींचे मत. तर या लक्षणे नसलेल्यांमुळे प्रसार वेगाने होतोय असा काहींचा आरोप. मृत्यूचा आकडा नगण्य आहे, असे सांगितले जातेय. करोनाला आता व्हीआयपी स्टेटस असल्यामुळे तेवढ्याच मृत्यूंची नोंद होतेय. त्यामुळे त्याची भीती पसरली आहे. वयोमान आणि त्यामुळे होणारे आजार यामुळेही मृत्यू होतात. याकडे करोनामुळे दुर्लक्ष केले जातेय अशीही बाब समोर आणली जातेय. या सगळ्यांचा मारा माध्यमांतून रोज होतो आहे. वेगवेगळे संशोधक, अभियंते, तज्ज्ञ सगळेच करोनाच्या मागे हात धुऊन कामाला लागले आहेत.
माननीय सर्वोच्च न्यायालयानेही आज केंद्र आणि राज्य सरकारांना फैलावर घेतले आहे. दिल्लीवर विशेष राग व्यक्त केला गेला. महाराष्ट्र आणि तमिळनाडूलाही कानपिचक्या दिल्या आहेत. करोनाने ज्यांचा बळी घेतला त्यांच्या मृतदेहांची विटंबना होतेय. एका रुग्णाचे शव कचरापेटीत आढळले. महाराष्ट्रातही एका वृद्धेचा मृतदेह रुग्णालयाच्या बाथरूममध्येच आढळला. मुंबईतील एक रुग्णही 13 दिवसांपासून बेपत्ता होता. त्याचा मृतदेह रेल्वे ट्रॅकच्या शेजारी आढळला. शवांची अदलाबदली झाल्याच्या घटना जवळपास रोजच घडत आहेत. रुग्णांना नाकारण्याच्या घटनाही भरमसाठ आहेत. परवाच एका महिलेला प्रवेश नाकारल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची बातमी होती.
एक दोन नव्हे, तर तब्बल आठ रुग्णालयांची दारे ठोठावली होती. कोणीच प्रवेश न दिल्यामुळे त्या रुग्णाने जगाचा निरोप घेतला. मुंबईतील रुग्णालयांतून सहा रुग्ण गायब झाल्याचा आरोप केला गेला आहे. त्या रुग्णांची नावेही प्रसिद्ध करण्यात आली आहे. अशा असंख्य घटना घडत आहेत. त्याची न्यायालयाने स्वत: दखल घेत संताप व्यक्त केला. रुग्णालयांत बेडची संख्या पुरेशी आहे, असे सरकार सांगते. मात्र, आत बेड रिकामे असतात. कारण केवळ खाटा ठेवल्या की रुग्ण आपोआप बरा होण्याची शक्यता नाही. त्याकरता इतर सुविधाही लागतात. सगळ्यांत महत्त्वाचे उपचार करणारे डॉक्टर्स आणि त्यांना मदत करणारे मदतनीसही आवश्यक असतात. त्यांनी पूर्ण क्षमतेने काम करणे आवश्यक असते. त्यांची संख्या पुरेशी असणे आवश्यक असते. असणाऱ्या मनुष्यबळाला जबाबदारीची जाणीवही असणे आवश्यक असते.
यापैकी काही नसले किंवा एकजरी गोष्ट कमी असली की वर उल्लेख केलेले सर्व प्रकार होतात. सध्या भारतात तेच होत आहे. इटलीत तेच झाले. त्याच्या बातम्या वाचल्या, व्हिडीओही फॉरवर्ड केले गेले. बोध मात्र घेतला गेला नाही. करोनाबद्दल दोन टोके गाठली गेली आहेत. त्यातील एक कमालीची भीती अन् दुसरे कमालीची बेफिकिरी. भीतीमुळे काम करणाऱ्यांची संख्या अगोदरच कमी झाली आहे. तर बेफिकिरांमुळे रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. मग करोनाचा लढा जिंकणार कसा? केवळ समूह संसर्ग नाही, मृत्यूचा दर कमी, रुग्ण बरे होण्याची टक्केवारी पन्नास अशा चर्चा मग निरर्थक व्हायला लागतात.
“अनलॉक 1′ मध्ये काही बंधने हटवली आहेत. ती आर्थिक गाडा चालू व्हावा यासाठी. तो विनाकारण मोकाट फिरण्याचा परवाना नाही. तसा अर्थ काढल्याने अनावश्यक गर्दी होण्याचे प्रकार वाढले आहेत. मास्क आपल्या सुरक्षेसाठी असल्याची भावना काही बहाद्दरांच्या जवळपासही फिरकत नाही. “मला काय होणार’ असा “ऍटिट्यूड’ दर तीन माणसांमागे एकात दिसतो. हे लोक स्वेच्छेने वाहक होत असल्याचा धोका आहे. पण कान कोणी टोचायचे? मृतदेहांची विटंबना होतेय, त्यामागे माणसे कमी आणि आहेत त्यांना काम न करण्याची जडलेली सवय यांचाही हातभार लागतोय. मुळात आरोग्य यंत्रणाच किती लंगडी आहे, याचा प्रशासनालाही आता ऐन युद्धात साक्षात्कार झाला असणार.
किमान आतातरी मूलभूत बाबींकडे त्यांनी लक्ष द्यावे. अन्यथा पुढच्या वेळीही मोठे संकट आल्यावर डॉक्टर भरतीपासून सुरुवात करावी लागेल. जशी आता पुण्यापासून दिल्लीपर्यंत सगळीकडे पाहायला मिळतेय. करोना हा प्रदीर्घ काळ चालणारा लढा आहे, हे एव्हाना स्पष्ट झाले आहे. जगात कोणतीही गोष्ट चिरकाल टिकून राहात नाही. करोनाचे संकट उद्भवले असले तरी त्यावर तोडगाही निघणार, हे खरे. मात्र तोपर्यंत सावधता, जागरूकता, जबाबदारीचे भान, सहकार्याची वृत्ती, कामाला प्राधान्य आणि आपण जे काम करतोय त्यावर श्रद्धा, विश्वास आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे स्वयंशिस्त या सगळ्याची सांगड घालावी लागेल. केवळ चर्चा आणि सल्ल्याच्या पलीकडे जाऊन कृतीशीलता दाखवावी लागेल. तरच विजय मिळवता येईल.