लोकशाही राजकारणामध्ये निवडणुकीच्या माध्यमातून रंगणारा राजकीय सत्तासंघर्ष भारतासारख्या मोठ्या लोकशाहीला जरी नवा नसला तरी एखाद्या लोकप्रिय खेळामध्ये राजकारणाचा शिरकाव होऊन सत्तासंघर्ष रंगतो, तेव्हा मात्र तो उत्सुकतेचा आणि चर्चेचा विषय ठरतो. भारतीय क्रिकेटमधील दोन मोठे स्टार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या निमित्ताने भारतीय क्रिकेटमधील हा सत्तासंघर्ष नव्याने समोर आला आहे. काही महिन्यांपूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने आपण टी-20 क्रिकेटचे कर्णधारपद सोडत असल्याची घोषणा केली होती.
त्यानंतर या क्रीडा प्रकाराचे कर्णधारपद रोहित शर्मा याच्याकडे जाणार हे निश्चित झाले होते आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्याचप्रमाणे टी 20 चे कर्णधारपद रोहित शर्माला बहाल केले. जेव्हा विराट कोहलीने टी-20 चे कर्णधारपद सोडले होते तेव्हा आपण एकदिवसीय क्रिकेटचे कर्णधारपद कायम ठेवणार असल्याचे त्याला सूचित करायचे होते; पण क्रिकेट नियामक मंडळाने काही दिवसांपूर्वी निर्णय घेऊन विराट कोहली यांच्याकडील एकदिवसीय
क्रिकेटचे कर्णधारपदही काढून घेतले आणि ती जबाबदारीही रोहितकडे देण्यात आली. त्यामुळे क्रिकेटमध्ये व्हाइट बॉल क्रिकेट म्हणतात त्या टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेटचे नेतृत्व आता रोहित शर्मा करणार असून रेड बॉल क्रिकेट म्हणजे कसोटी संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडे राहिले आहे. विराट कोहलीला खरे तर एकदिवसीय क्रिकेटचे नेतृत्व सोडायची इच्छा नव्हती; पण विनाकारण एकाच प्रकारच्या क्रिकेटमध्ये दोन संघनायक नकोत म्हणून भारतीय क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी विराट कोहलीकडून या क्रिकेटचे नेतृत्व काढून घेतले.
खरे तर विराट कोहलीने आपणहून एकदिवसीय क्रिकेटचे नेतृत्व सोडावे, अशी अपेक्षा क्रिकेट नियामक मंडळाने व्यक्त केली होती; पण विराटने प्रतिसाद न दिल्याने अशाप्रकारे कर्णधारपद काढून घ्यावे लागले. या सर्व गोष्टी चाहत्यांसाठी निराशजनक असल्या तरी त्याच्यातून विनाकारणच विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोन महान खेळाडूंमधील संघर्ष समोर येऊ लागला आहे. भारतीय क्रिकेट संघ आता दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यामध्ये कसोटी सामने आणि झटपट क्रिकेटचे सामने खेळले जाणार आहेत;
पण रोहितने अचानक आपण कसोटी मालिका खेळू शकत नाही अशी भूमिका जाहीर केली, तर आपण दक्षिण आफ्रिकेतील एकदिवसीय सामने खेळणार नाही, अशी घोषणा विराट कोहली याने केली होती. या दोघांकडेही या निर्णयाबाबत योग्य कारणे असली तरी ती कारणे वरवरची आहेत की खरोखरच योग्य आहेत? कोहलीने आपल्या मुलीच्या वाढदिवसाचे कारण पुढे करून आपण एकदिवसीय सामने खेळणार नसल्याचे सांगितले होते, तर रोहित शर्माने मांडीला दुखापत झाल्याचे सांगून कसोटी क्रिकेटमधून माघार घेतली आहे.
याचा वेगळ्या प्रकारे विचार करायचा झाला तर विराटला रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळायची इच्छा नाही, तर रोहितला विराटच्या नेतृत्वाखाली खेळायची इच्छा नाही, असाच अर्थ काढावा लागतो. या गडबडीला काही प्रमाणात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ जबाबदार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने मोठ्या प्रमाणावर प्रगती केली असूनही आयसीसीने पुरस्कृत केलेल्या कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला विजेतेपद पटकावता न आल्याने त्याचा ठपका विराटवर ठेवण्यात आला आणि त्याच्याकडून एकेक कर्णधारपद काढून घेण्यात आले.
काही महिन्यांपूर्वी इंग्लंडमध्ये खेळविण्यात आलेल्या कसोटी विजेतेपद अजिंक्यपद स्पर्धेमध्येही भारताला न्यूझीलंडकडून हार पत्करावी लागली होती. नजीकच्या कालावधीमध्ये कसोटी क्रिकेटचे नेतृत्वही रोहित शर्माकडे जाण्याचे संकेत बीसीसीआयने दिले आहेत. भारतीय क्रिकेटला अशा प्रकारचे राजकारण आणि सत्तासंघर्ष जरी नवीन नसला तरी जागतिक क्रिकेटमध्ये ज्यांच्याकडे आदराने पाहिले जाते ते विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यासारख्या खेळाडूंबाबत या गोष्टी घडत असल्याने त्यांच्या वैयक्तिक कामगिरीवर परिणाम झाला, तर ते त्यांच्या कोट्यवधी चाहत्यांना मुळीच आवडणार नाही.
रोहित काय किंवा विराट काय आपल्या कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात आलेले आहेत. बारा ते पंधरा वर्षे क्रिकेट खेळणाऱ्या या दोन्ही खेळाडूंनी भारतीय क्रिकेटची खूप चांगली सेवा केली आहे. त्यामुळे त्यांच्या कारकिर्दीचा शेवटही चांगला होण्याची गरज आहे. हे दोघे खेळाडू आणखी दोन-तीन वर्षे क्रिकेट खेळणार असले, तरी या कालावधीमध्ये त्यांची कामगिरी पूर्वीप्रमाणे उत्तम होण्याची गरज आहे आणि त्यासाठी योग्य वातावरण तयार व्हायला हवे. या प्रकारच्या सत्तासंघर्षामुळे संघाच्या एकूण कामगिरीवरही परिणाम होण्याची शक्यता असते. भारताचा आगामी दौरा आफ्रिकेसारख्या परकीय भूमीत आहे. या दौऱ्यामध्ये जर भारताला अपयश मिळाले, तर त्याचा संपूर्ण ठपका या सत्तासंघर्षावरच फोडला जाईल यात कोणतीही शंका नाही;
पण विराट किंवा रोहित यांनी याबाबत आपली कोणतीही भूमिका जाहीरपणे प्रदर्शित केली नसली, तरी आता त्यांनीच पुढाकार घेऊन याबाबतचे सगळे मतभेद, समज आणि गैरसमज संपवण्याची गरज आहे. विराटने तसे केल्याचे स्वागत आहे. या दोघांच्या कामगिरीच्या जोरावर भारताला अजून अनेक विजेतेपद मिळवण्याची आशा आहे. क्रिकेटपटूंची जी नवी पिढी आणि फळी तयार होत आहे त्यांच्या मनात विश्वासाचे वातावरण तयार व्हावे आणि त्यांना आपल्या भविष्याविषयी कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी भारतीय क्रिकेटमध्ये योग्य वातावरण तयार करण्याची गरज आहे.
क्रिकेट किंवा इतर कोणत्याही खेळांमध्ये संघनायक नेहमीच बदलले जातात; पण खेळाडूंची कामगिरी मात्र नेहमी महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे विराट कोहलीने आपला मोठेपणा दाखवून रोहित शर्माचे नेतृत्व एकदिवसीय क्रिकेटमध्येही मान्य करायला हरकत नाही. सर्वच प्रकारच्या क्रिकेटमध्ये रोहित आणि विराट यांची उपस्थिती भारतीय संघाच्या अत्युच्च कामगिरीसाठी महत्त्वाची असल्याने या दोन खेळाडूंनी स्वतःहूनच हा सत्तासंघर्ष संपवावा.