पुणे- आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा गोंधळ थेट न्यायालयात पोहोचला आहे. हा प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा फुटल्याची याचिकाही उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. त्यातच, महापालिकेने राज्य निवडणूक आयोगाकडे प्रभाग रचना सादर केल्यानंतर त्यात आयोगाने काढलेल्या त्रुटींची पूर्तता आता निवडणूक आयोगच करणार आहे.
दोन दिवसांपूर्वी प्रभाग रचनेत या त्रुटी दूर करून सुधारीत रचना आयोगास पाठविण्याच्या सूचना महापालिकेस देण्यात आल्या होत्या. मात्र, आता आयोगच हे बदल करणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले. तसेच, त्यासाठी स्वतंत्र अधिकारीही नियुक्ती केला जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रभाग रचनेत आता कोणालाही हस्तक्षेप करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
महापालिका प्रशासनाकडून सोमवारी ( दि.13) राज्य निवडणूक आयोगापुढे सादरीकरण केले. त्यानंतर आयोगाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार रचना झालेली नसल्याने 28 त्रुटी काढल्या होत्या. त्यात बदल करण्याच्या सूचना केल्या होत्या. आयोगाचे पत्र आल्यानंतर हे बदल केले जातील, असे सांगण्यात येत होते. मात्र, प्रारूप प्रभाग रचनेते आयोगाने जे बदल सुचविले आहेत हे बदल करताना रस्ते, ओढे, नाले, नदी, डोंगर अशा नैसर्गिक हद्दीची पालिकेकडून उपलब्ध करून घेऊन त्यानुसार आता आयोगच बदल करणार असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले.