“पॉलिटिक्स इज अ गेम ऑफ स्काउंड्रेल्स’, असे म्हटले जाते. “युद्धात, प्रेमात आणि राजकारणात सारे काही माफ असते’, हे तर आपल्याला माहीतच आहे. या म्हणी सार्थ ठरवण्याच्या इराद्याने राजकारणी वागत असतात, असेही बरेचदा दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बुधवारी सुरक्षेतील गंभीर त्रुटीमुळे पंजाबचा दौरा अर्धवट सोडून दिल्लीला परतावे लागले. पंतप्रधानांच्या सुरक्षेत पंजाब पोलिसांकडून हलगर्जीपणा झाल्याचे नमूद करत, केंद्रीय गृहखात्याने यासंबंधी अहवाल मागवला आहे. परंतु या घटनेवरून राजकीय वादंग माजले असून, भाजप आणि कॉंग्रेसने परस्परांवर टीकेचा भडिमार केला आहे.
देशातील सर्वोच्च नेत्याच्या सुरक्षेवरून दोन्ही बाजूंनी ज्या पातळीचे राजकारण सुरू आहे, ते अत्यंत पोरकट आणि उबग आणणारे आहे. पंतप्रधान हे कोणत्याही एका पक्षाचे नव्हे, तर संपूर्ण देशाचे असतात. प्रादेशिक पक्षाच्या नेत्याने एकवेळ संकुचितपणा केला, तर ते समजू शकते; परंतु राष्ट्रीय पक्षाच्या नेत्याने तरी प्रगल्भतेने आणि जबाबदारीने वागले पाहिजे. पंजाबमधील फिरोजपूर येथील सभेसाठी निघालेला पंतप्रधानांचा ताफा शेतकरी आंदोलकांनी अडवला. त्यामुळे मोदी हे भटिंडामधील पुलावर 15 ते 20 मिनिटे अडकून पडले होते. हा भाग पाकिस्तानच्या सीमेपासून अगदी दहा किलोमीटरवर असून, अलीकडील काळात तेथून भारतावर ड्रोन हल्लेही होत असतात;
परंतु मोदींच्या सुरक्षेत जाणीवपूर्वक त्रुटी ठेवून, त्यांना शारीरिक इजा पोहोचवण्याचा धोका निर्माण केल्याचा थेट आरोप केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. वास्तविक ही चूक पंजाबमधील कॉंग्रेस सरकारने जाणीवपूर्वक केली आहे, असा गंभीर आरोप करण्यापूर्वी इराणी यांनी दोनदा विचार करायला हवा होता. केंद्रात व राज्यात वेगवेगळी सरकारे असली, तरी परस्परांबद्दल इतका संशय बाळगणे हे अत्यंत चुकीचे होते. मोदींच्या सुरक्षेत कोणताही गलथानपणा झाला नाही. हेलिकॉप्टरऐवजी कारने जाण्याचा निर्णय शेवटच्या क्षणी घेण्यात आला. रात्रभर व्यक्तिशः लक्ष घालून, सभेसाठी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती, असा खुलासा पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी केला आहे.
परंतु ढगाळ हवामानामुळे पंतप्रधानांच्या प्रवासाबाबत हा निर्णय घेण्यात आला होता. आयत्यावेळी अशा प्रकारचे निर्णय घ्यावे लागतात. वाहतूक व्यवस्थेत करण्यात आलेल्या बदलाची आपल्याला पूर्वकल्पनाच नव्हती, हा चन्नी यांचा दावा मात्र पूर्णपणे खोटा आहे. त्यांना याची कल्पना दिल्याची माहिती देणारे पुरावेच केंद्र सरकारकडे आहेत. हुसैनवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकापासून तीस किमी अंतरावरील पुलावर मोदींचा ताफा आला असता, आंदोलकांनी रस्ता बंद केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मोदींचा ताफा पुलावर अडकून पडला. या संधीचा फायदा घेऊन, भारताच्या शत्रूने काही केले असते,
तर किती गंभीर प्रसंग उद्भवला असता, याची कल्पनाच केलेली बरी. पंतप्रधानांचा हा दौरा व प्रवासाचे आगाऊ नियोजन पंजाब सरकारशी चर्चा करूनच निश्चित करण्यात आले होते. पंतप्रधानांच्या प्रवासाची, सुरक्षेची तसेच आपत्कालीन पर्यायी व्यवस्था करण्याची जबाबदारी पंजाब सरकारचीच होती. त्याकरिता अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था तैनात करणे अत्यावश्यक होते. पण मोदी यांच्या सुरक्षेत कोणतीही त्रुटी नव्हती, असे चौकशी होण्यापूर्वीच चन्नी यांनी जाहीर करून टाकले आहे! मोदींच्या सभेसाठी 70 हजार खुर्च्या मांडल्या होत्या, पण तिथे जेमतेम 700 लोक आले, अशी खोचक टिप्पणीही चन्नी यांनी केली.
पंजाबमधील शेतकऱ्यांचा केंद्र सरकारवरील रोष नवी दिल्लीतील वर्षभर चालू असलेल्या आंदोलनातून व्यक्त झाला आणि त्यानंतर कृषी कायदे मागे घ्यावे लागले. पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका असून, नियोजित सभेत हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प घोषित करण्याचा पंतप्रधानांचा इरादा होता. या सभेला तुटपुंजी गर्दी होती हे खरे असले, तरी पंतप्रधानांच्या सुरक्षेची चर्चा सुरू असताना, चन्नी यांनी या प्रकारची उपरोधिक टिप्पणी करण्याचे कारण नव्हते. आपल्या राज्यात आलेल्या पंतप्रधानांची चेष्टा करणे, हे मुळीच शोभादायक नाही. कॉंग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी चन्नी यांच्या विधानांचे समर्थन केले असून,
भाजपने शेतकरीविरोधी भूमिकेचा फेरविचार करावा, असे म्हटले आहे. वास्तविक भाजपची भूमिका आणि पंतप्रधानांची सुरक्षा हे वेगवेगळे विषय आहेत. तसेच 400 शेतकऱ्यांचा जमाव तिथे असता, तर त्यांनी गोळ्या घालायला हव्या होत्या का, असा भंपक सवालही सुरजेवाला यांनी विचारला आहे. या शेतकऱ्यांना तिथे जमूच का दिले किंवा त्यांना समजावून मागे रेटण्यात का आले नाही, हा खरा प्रश्न आहे. “मी भटिंडा विमानतळावर जिवंत परतलो, त्याबद्दल तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद कळवा’, अशी उपरोधिक टिप्पणी मोदी यांनी पंजाबच्या अधिकाऱ्यांना उद्देशून केली. या प्रकारची शेरेबाजी आणि तीही सरकारी अधिकाऱ्यांजवळ जाहीरपणे त्यांना का करावीशी वाटली, हे कळायला मार्ग नाही.
मोदींनी असे वक्तव्य करणे, म्हणजे लाखो देशभक्त पंजाबी लोकांच्या अस्मितेवरच हल्ला होय, असे उद्गार पंजाब कॉंग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी काढले आहेत. सिद्धू हे ताळतंत्र सोडून बोलणारे नेते असून, मोदींची सुरक्षा आणि पंजाबी अस्मिता यांचा मुळात एकमेकांशी संबंध काय? तर पंतप्रधानांचा जीव धोक्यात आणण्याचे षड्यंत्र करणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली असून,
ती रास्तच आहे. मात्र, मोदींच्या दीर्घायुष्यासाठी देशात ठिकठिकाणी महामृत्युंजय जप करणे, याला काय म्हणावे, असा प्रश्न पडतो. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण हे तर जप संपेपर्यंतदेखील थांबले नाहीत. केवळ कॅमेऱ्यापुढचे क्षण साजरे करण्यावर समाधान मानून ते चालते झाले. पंतप्रधानांची सुरक्षा हा जाहीर चर्चेचा विषय नसून, या प्रकरणी लवकरात लवकर चौकशी करून जबाबदारी निश्चित व्हायला हवी. प्रत्येक पक्षालाच राजकारण करायचे असते. परंतु काही विषय राजकारणाच्या बाहेर ठेवून, ते सहमतीने सोडवायचे असतात. बेभानपणे राजकारण केले, की नेमके हेच भान सुटत असते.