वॉशिंग्टन : मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरणातील आरोपी डेव्हीड हेडली याला भारताकडे हस्तांतरीत करण्यात येणार नाही. मात्र या हल्ल्याचा सह सूत्रधार आणि पाकिस्तानी वंशाचा आणि कॅनडात व्यवसाय करणारा तहव्वूर राणा याला भारताकडे सोपवले जाईल, असे न्यायालयात अमेरिकेच्या ऍटर्नी जनरलनी स्पष्ट केले.
राणा (वय 59) हा बालपणापासूनचा मित्र. 2008 मधील मुंबई दहशतवादी हल्ल्यातील त्याच्या सहभागाबद्दल त्याला भारताच्या ताब्यात सोपवण्याची मागणी भारताने केली होती. त्याला फरारी आरोपी घोषीत केले होते.
2006 ते 2008 या काळात राणाने दाऊद गिलानी या नावानेही ओळख असणाऱ्या हेडलीसोबत मुंबई हल्ल्याचा कट रचला. त्यात पाकिस्तानातील लष्कर ए तोयबा आणि हरकत उल जिहाद इ इस्लामी या दोन्ही दहशतवादी गटाशी संधान बांधले. त्यांच्या सहाय्याने मुंबईत दहशतवादी कट घडवून आणला.
या काटाचा हेडली हा माफीचा साक्षीदार बनला आहे. तो सध्या या हल्ल्यातील सहभागाबद्दल अमेरिकेत 35 वर्ष कारावासाची शिक्षा भोगत आहे.
राणाच्या हस्तांतरणासाठी भारताने केलेला अर्ज न्यायलयापुढे अद्याप मांडला नाही. मात्र तो लवकरच सादर केला जाण्याची शक्यता आहे. राणाने आपला साथिदार येथील कारागृहात ठेवून मला भारताकडे हस्तांतरीत करणे अयोग्य असल्याचा युक्तीवाद केला. मात्र त्याला सहाय्यक सरकारी वकील जॉन जे ललेजिअन यांनी विरोध केला, ते म्हणाले, हेडलीने आपला गुन्हा तातडीने कबूल केला. मात्र राणा यांनी तपास यंत्रणांना सहकार्य केले नाही. तसेव गुन्हाही कबूल केला नाही. या शिवाय त्याची तक्रार त्याला हस्तांतरीत करण्याबाबत नाही. तर त्याचा साथीदार हस्तांतरीत न केला जात असल्याबद्दल आहे, असे ते म्हणाले.
राणाच्या जामीन अर्जावर पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे. अमेरिकेने तो फरार होण्याची शक्यता नसल्याचे म्हटले आहे. मात्र त्याला 15 लाख अमेरिकन डॉलर्सचा जामीन द्यावा लागेल. त्याला व्यक्तीगत जातमुचलका मिळू शकेल. त्याची कन्या लेमान राणा ही पीएच. डी. करत आहे, असे राणाचे वकील ऍमे कारलीन म्हणाले.
राणावर भारतात हत्या फसवणूक यासह भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली आरोप होत आहेत. तसेच तो पळून जाण्याची भीती आहे. त्यामुळे त्याला जामीन देण्यात येऊ नये अशी मांडणी सरकारी वकीलांनी केली. भारतात त्याच्यावर गुन्हा सिध्द झाला तर राणाला फाशीही होऊ शकते. त्यामूळे तो पळून जाऊ शकतो, असाही युक्तीवाद करण्यात आला.
मुंबई दहशतवादी हल्ल्यात 166 जण मरण पावले होते. 300 जण जखमी झाले होते. त्यात 10 अत्याधुनिक शस्त्रसज्ज लोक सहभागी होते. त्यातील अजमल कसाब या एकमेव अरोपी जिवंत हाती सापडला होता. त्याला भारतात 21 नोव्हेंबर 2012ला फाशी देण्यात आले होते.