परंदवाडी: देशाचे माजी पंतप्रधान स्व. चंद्रशेखर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आज भारत यात्रा सेंटर, परंदवाडी येथे शरद पवारांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. दरम्यान, चंद्रशेखरजींच्या पुतळ्याचे अनावरण होऊन देशासाठी ही प्रतिमा समर्पित करण्यात येत असल्याचा सार्थ अभिमान असल्याचे पवार म्हणाले.
त्यानंतर भाषणात बोलताना शरद पवार यांनी स्व. चंद्रशेखर यांच्या काही आठवणींना उजाळा दिला. शरद पवार म्हणाले, स्व. चंद्रशेखर यांनी आचार्य नरेंद्र देवजींच्या आदर्शावर काम सुरू केले. जयप्रकाश नारायणजींच्या मार्गदर्शनाखाली ते आंदोलनात सक्रिय झाले. संसदेत कोणत्याही विषयावर बोलताना त्यांनी कधी कागद हातात घेतला नाही. आंतरराष्ट्रीय समस्येवर देखील ते अस्खलितपणे बोलत असत. संसदेचा लौकिक राखण्यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले.
देशातील तळागाळातील जनतेसाठी काम करण्यास चंद्रशेखरजी सदैव तत्पर असत. त्यांनी विचारधारेशी तडजोड केली नाही. मग कोणतीही किंमत मोजण्यास ते तयार असत. माझे सौभाग्य की, कितीतरी वर्षे त्यांच्या समवेत काम करण्याची संधी मला मिळाली असल्याचे पवार म्हणाले.
शरद पवार म्हणाले, स्व. इंदिराजींशी व्यक्तिगत संबंध चांगले असतानाही आणीबाणीच्या काळात चंद्रशेखर त्यांच्याविरोधात उभे ठाकले. कारावास पत्करला, परिणामांची तमा बाळगली नाही. विभिन्न विचारधारेचे पक्ष सोबत घेऊन त्यांनी सरकार स्थापले. सत्तेपेक्षा संघटनशक्ती बळकट करण्याकडे त्यांनी नेहमी लक्ष पुरवले.
एकदा राज्यात काँग्रेस पक्षात मतभेद झाले. चंद्रशेखर जनता दलाचे नेते होते, पण त्यांनी मला संपूर्ण सहकार्य केले. १९७८ मध्ये मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो याचे श्रेय त्यांनादेखील जाते. मी जळगाव-नागपूर शेतकरी दिंडी काढली, त्या दिंडीच्या समारोपाच्या वेळी सुद्धा ते उपस्थित होते.
स्व. चंद्रशेखर यांनी कन्याकुमारी ते दिल्ली भारत यात्रा केली. या यात्रेच्या मार्फत त्यांनी देशातील एकता अबाधित राखण्यासाठी प्रयत्न केले. पण या भारतभ्रमणात त्यांच्या चेहऱ्यावर कधी थकवा जाणवला नाही. आज या अनावरण सोहळ्याप्रसंगी भाई वैद्य, सहकार शिरोमणी इंदूभाई पटेल यांचाही उल्लेख करणे आवश्यक आहे. परंदवडी येथील भारत पदयात्रा ट्रस्टचे उत्तम काम त्यांनी केले आहे, ट्रस्टसाठी मोलाचे योगदान दिले आहे. चंद्रशेखरजींना मोलाची साथ देणाऱ्या भारत पदयात्रींचे मी याप्रसंगी आभार मानतो.