हिमांशू
प्रिय पावसा,
लहानपणी आम्ही तुला बोलावण्यासाठी पैसा देऊ केला, ही आमची घोडचूक आता तरी पोटात घे. काहीतरी देऊ केल्यावर काहीतरी मिळतं, हेच आम्हाला शिकवलं गेलंय रे! अगदी लहानपणापासून. पण अशा व्यवहारांमुळे पैसा मोठा होतो आणि पाऊस खोटा होतो, हेही तेच बडबडगीत सांगत आणि आम्ही सोयीस्करपणे तेवढंच विसरतो. शहरं मोठी झाली आणि पैसाही मोठा झाला. आम्ही हात धुऊन त्या पैशाच्या मागे धावू लागलो. पैसा मिळवायला घराबाहेर पडायचे, पैसा साठवायचा, घर बांधायचे, सजवायचे ही मर्यादित स्वप्नंसुद्धा वाटतात तेवढी साधी-सोपी नाहीत. पोराबाळांकडे दुर्लक्ष करून बापाबरोबरच आईलाही घराबाहेर पडावे लागते.
दोघं मिळून जे कमावतील, त्यातून तरी घर होईल अशी आशा आम्हाला वाटते. प्रसंगी मन मारून, मनाविरुद्ध काम करूनही अनेकजण पैसा मिळवत राहतात. घरं बांधली जातात, शहर वाढत जाते. त्या शहराच्या एखाद्या कोपऱ्यात आम्हाला आमची हक्काची जागा मिळते. थकलेली शरीरं घेऊन आम्ही त्या कोपऱ्यात येतो आणि दार बंद केल्यावर वाटतं, आत आम्ही सुरक्षित आहोत. परंतु प्रचंड वेगानं वाढणाऱ्या कोणत्याही शहरात, कोणत्याही कोपऱ्यात, कोणीही सुरक्षित नाही, याची जाणीव तू आम्हाला वारंवार करून देऊ लागलास. मुंबई असो वा पुणे, घर असो वा ऑफिस, आम्ही कुठेच सुरक्षित नसतो. असं का? कशामुळं? कुणामुळं?
तुझं उग्ररूप पाहिलं की दरवेळी आम्हाला हे प्रश्न पडतात. याच प्रश्नांवरून टीव्हीवर चर्चा झडतात. वीजपुरवठा खंडित झाला नसेल, तर त्या आम्हीही ऐकतो. निसर्गाचा समतोल बिघडण्याची असंख्य कारणे वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या तोंडून समजून घेतो. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणाऱ्यांचे शब्दसामर्थ्य अनुभवतो. पण दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला पुन्हा दैनंदिन लढाईसाठी घराबाहेर पडावे लागते. आमची चिमुकली घरे एका मोठ्या इमारतीचा एक छोटा कोपरा असतात. ती इमारत अशा जागी उभी असते, जिथं ती असता कामा नयेत. परंतु जागाच नसल्यामुळे नकाशातल्या निळ्या रेषा गायब केल्या जातात. अगदी संगनमताने. कितीही वर्षांपूर्वीचे नकाशे काढून पाहिले, तरी त्यात या निळ्या रेषा दिसत नाहीत.
आमच्या छोट्या-मोठ्या अपेक्षा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा समावेश असणारा एक भलामोठा दस्तावेज तयार केला जातो. त्याला आम्ही “डेव्हलपमेंट प्लॅन’ म्हणतो. हा दस्तावेज तयार करणारी मंडळी भगीरथापेक्षा अधिक तपस्वी असतात. भगीरथाने फक्त गंगाच आणली पृथ्वीवर; पण ही मंडळी त्या गंगेला आपल्या सोयीनुसार वळवू शकतात. ओढे-नाले पाइपमध्ये बंदिस्त करू शकतात. प्रसंगी ओढ्या-नाल्यांचे अस्तित्वच नष्ट करू शकतात. असलेल्या-नसलेल्या निळ्या रेषांवरच आमचं जग, आमचं घर आकार घेतं.
यंदा सप्टेंबर संपत आला तरी तू एक्झिट घेतलेली नाहीस. जुलै, ऑगस्टमध्ये काही शहरं तू कवेत घेतलीस. वाटले, तुझे समाधान झाले असेल. आमच्या अंदाजाला हवामान खात्याचे भक्कम पाठबळ होते. परंतु न सांगता येणे ही तुझी खासियतच! तुला मिलीमीटरमध्ये मोजता येईल; पण बांधून ठेवता यावं, इतके मोठे आम्ही अजून झालेलो नाही. पण हे आमच्या लक्षातसुद्धा राहू नये, इतकं आम्हाला हतबल केलंय रे! तूही आणि यंत्रणेनंही!