Harshavardhan Patil । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व पक्षात जागावाटपावरून चर्चा सुरु आहे. त्यातच आता महायुतीतील मित्र पक्षात वरवर आलबेल असल्याचे दिसत असले तरी शिंदे आणि पवार गटात सध्या खटके उडताना दिसून येतात. शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी अजित पवारांच्या विरोधाची बंडाची भूमिका घेतली. हे सुरु असतानाच आता इंदापूरच्या हर्षवर्धन पाटलांनीही पवारांविषयीची आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवलीय.
आज बारामती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील, अंकिता पाटील यांच्याशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी,”महायुतीचा धर्म सगळ्यांनीच पाळणं गरजेचं आहे, लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत जाहीर सभेत आपल्याला धमक्या मिळतात हे चुकीचं असल्याचं सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली. शिंदे गटाच्या विजय शिवतारेंच्या बंडानंतर आता भाजपमधील नेतेही त्यांच्याविरोधात भूमिका घेण्याची शक्यता आहे.
अजित पवार गटाकडून दमदाटीची भाषा चुकीची Harshavardhan Patil ।
देवेंद्र फडणवीसांशी चर्चा झाल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी, महायुतीमध्ये असलेल्या सर्वच पक्षांनी युतीधर्म पाळला पाहिजे. अजित पवार गटाचे नेते आपल्याला जाहीर भाषणात धमक्या देतात, दमदाटीची भाषा करतात आणि तेही लोकप्रतिनिधी मंचावर उपस्थित असताना. हे चुकीचं आहे. या सगळ्या गोष्टींवर फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली.
स्थानिक प्रश्न सुटले पाहिजेत Harshavardhan Patil ।
पुढे हर्षवर्धन पाटील म्हणाले की, “आजच्या बैठकीत पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकीवर चर्चा झाली. बारामतीवर चर्चा झाली. त्यामध्ये आपल्या स्थानिक कार्यकर्त्यांची भावना काय आहे ते सांगितलं. देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदींनी बसवण्याची जबाबदारी आपली आहे, त्यामुळे त्यासाठी लागणारे सर्व सहकार्य करणार. स्थानिक स्तरावरील प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अजित पवार यांच्याशी चर्चा करणे आवश्यक असल्याचं हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं. त्यावर आपण यावर योग्य तो तोडगा काढू असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी दिला असल्याचं त्यानी म्हटले.