Shirur Lok Sabha Election 2024| लोकसभा जागा वाटपासाठी महायुतीकडून तयारी केली जात आहे. अनेक भागातील जागा वाटपात महायुतीमध्ये वाद निर्माण झाले आहेत. यात शिरूर लोकसभेच्या जागेवरून महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये संघर्ष सुरू होता. शिवाजीराव आढळराव पाटील यांना शिरुरमधून उमेदवारी देण्यास दिलीप मोहिते पाटील यांनी थेट विरोध केला होता. त्यामुळे मोहिते पाटलांची नाराजी दूर करण्यासाठी अजित पवारांनी ही भेट घेतली आहे.
यानंतर मोहिते पाटील यांनी आपले सुर बदलल्याचे पाहायला मिळाले. यामुळे शिवाजी आढळराव पाटील यांचा उमेदवारीचा मार्ग मोकळा झालेला आहे. ‘मी आढळराव पाटलांचा प्रचार करणार पण शिवसेनेबद्दलची माझी नाराजी कायम आहे, असं दिलीप मोहिते पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधीच शिरुर या मतदारसंघाची विशेष चर्चा होती. कारण या जागेवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अमोल कोल्हे हे निवडणूक लढवणार आहेत. या जागेवरून आमचाच उमेदवार विजयी होणार, असा विश्वास याआधी अजित पवारांनी व्यक्त केला होता. त्यामुळे अमोल कोल्हे यांच्यापुढे थेट आव्हानच उभे राहिले होते. यातच आता शिरूरमध्ये आढळराव आणि अमोल कोल्हे यांच्यात लढत होणार असल्याचे पाहायला मिळणार आहे.
नेमकं काय म्हणाले दिलीप मोहिते पाटील ?
“आम्ही अजित पवार यांचं नेतृत्व मान्य केलेलं आहे. उद्या अजित पवार यांचं नेतृत्व अडचणीत येणार असेल तर आम्ही आमच्या भावनांना आवर घालणं गरजेचं आहे. त्यामुळेच मी त्यादृष्टीने निर्णय घेतला आहे. माझे आणि आढळराव पाटलांचे टोकाचे मतभेद आहेत. पण हे मतभेद विसरून मला त्यांच्यासोबत जायचं आहे. त्यांचं काम मला करायचं आहे, “असे मोहिते पाटलांनी सांगितलं.
आढळरावांचा एखादा गट तयार होऊ नये. या गटामुळे मला राजकीय त्रास होऊ नये, अशी माझी भूमिका होती. म्हणूनच मी अजित पवार यांना बोलावलं होतं. आमच्यात चर्चा झाली. अजित पवार यांनीदेखील मोकळेपणाने समर्पक उत्तरं दिली. त्यांनी माझ्या कार्यकर्त्यांच्या मनातील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला, अशी माहितीही मोहिते पाटलांनी दिली.
शिरुर लोकसभा मतदार संघात सध्या अमोल कोल्हे खासदार आहेत. मात्र राष्ट्रवादी फुटल्यानंतर अमोल कोल्हे हे शरद पवार गटात गेले. त्यानंतर आता शिरुरमध्ये महायुतीकडून उमेदवारी कोणाला मिळणार, याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर अमोल कोल्हे यांना पाडणार म्हणजे पाडणार असा चंग अजित पवारांनी बांधलाय. त्यामुळं या मतदार संघावरुन महायुतीत स्पर्धा निर्माण झाली आहे.
हेही वाचा: