-अमित डोंगरे
एकदिवसीय किंवा टी-20 म्हणजेच मर्यादित षटकांचे सामने जिंकायचे असतील तर संघात किमान दोन जागतिक दर्जाचे अष्टपैलू असावेत असे बोलले जाते. त्यात तथ्यही आहे कारण अष्टपैलू खेळाडू फलंदाजी व गोलंदाजीच्या जोरावर सामन्याचा निकालही फिरवू शकतो. आज हार्दिक पंड्या भारतीय संघाकडून हेच करत आहे.
टी-20 मालिकेतील भारताचे यश पाहिले तर पंड्या हाच दोन्ही संघातील फरक ठरला. ऑस्ट्रेलिया संघात ग्लेन मॅक्सवेल, मोझेक हेन्रीक्स, डॅनियल साम्स, मार्क स्टोनिस असे चार अष्टपैलू खेळाडू आहेत. मात्र, त्यांना दर्जाला साजेशी कामगिरी करता आली नाही व तिथेच त्यांनी सामने गमावले. आयपीएल स्पर्धेत स्टोनिसने कलामीचे सातत्य दाखवले. या मालिकेत मात्र, त्याच्याकडून एकाही सामन्यात लक्षवेधी कामगिरी झाली नाही.
एकूणच त्यांच्या अष्टपैलूंना भारताचा संमिश्र गोलंदाजीला कसो सामोरे जायचे तेच समजत नव्हते. त्यातच फिरकी गोलंदाजी ही जवळपास सर्वच परदेशी संघांची डोकेदुखी ठरली आहे. भारताकडे अनुभवी म्हणावा असा यजुवेंद्र चहल हा एकच फिरकी गोलंदाज आहे. रवींद्र जडेजा दुखापतीने जायबंदी झाल्याने सगळा भार चहलकडेच आला आहे.
मात्र, तरीही ऑस्ट्रेलीयाला चाचपडावे लागत आहे. अर्थात खरा धडाकेबाज पंड्या ठरला आहे. गेले जवळपास दीड वर्ष त्याने गोलंदाजी केली नव्हती. या मालिकेत मात्र, त्याने गोलंदाजी करत आपण पूर्ण तंदुरुस्ती असल्याचे सिद्ध केले.
अर्थात त्याच्या गोलंदाजीपेक्षा त्याची बेदरकार फलंदाजी भारतीय संघासाठी लाभदायक ठरली. त्याने सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत सामने फिरवले. तोच या मालिकेत ट्रम्पकार्ड ठरला, असे म्हटले तरीही वावगे ठरणार नाही. पहिल्या सामन्यात त्याने जडेजाला साथीला घेत संघाच्या डावाला आकार दिला. दुसरा सामना आपण गमावणार असे वाटत असतानाच त्याने खेळपट्टीवर पाऊल ठेवले व आपले राज्य प्रस्थापित करताना संघाला सहज विजय मिळवून दिला.
जडेजा दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकला नाही, पण त्याच्या जागी आलेल्या श्रेयस अय्यरला साथीला घेत पंड्याने आक्रमकता हेच बचावाचे योग्य धोरण असल्याचे सिद्ध करताना कोणतेही दडपण न घेता ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीची लक्तरे सिडनीच्या वेशीवर टांगली.
दुसरा सामना सुरू असताना अखेरच्या षटकांत 14 धावांची गरज असताना पंड्याने दोन षटकार मारले व हळूच स्टिव्ह स्मिथकडे पाहून डिवचले. त्याला हेच सांगायचे होते की, तो देखील व्यावसायिक क्रिकेटपटू आहे व अखेरच्या षटकापर्यंत आलेला सामना कसा जिंकायचा त्याचे बाळकडू महेंद्रसिंग धोनीकडूनच घेतल्याचेही त्याने दाखवून दिले.
ही मालिका आपण जिंकली याचे मुख्य कारण म्हणजे पंड्या हाच दोन संघातील फरक ठरला. नैसर्गिक गुणवत्ता व बेदरकार वृत्ती असलेला हाच पंड्या आता येत्या काळातही भारतीय संघासाठी ट्रम्पकार्ड ठरेल यात शंका नाही.