नवी दिल्ली – आयसीसी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी पूर्ण तंदुरुस्त नसतानाही अष्टपैलू हार्दिक पंड्या याची निवड कशी व का केली गेली, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
जर पंड्या पूर्ण तंदुरुस्त नाही, तर त्याला भारतीय संघात स्थान का देण्यात आले, असा गंभीर सवाल निवड समितीचे माजी अध्यक्ष साबा करीम यांनी केला आहे.
हार्दिक आयपीएल खेळण्यासाठी अमिरातीत दाखल झाला असला तरी तो मुंबई इंडियन्सच्या दोन्ही सामन्यांमध्ये खेळला नव्हता. त्यामुळे जर तो पूर्ण तंदुरुस्त नसेल तर तो भारतीय संघात कसा काय स्थान मिळवू शकतो, असा सवाल करीमने केला आहे.
टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी जेव्हा भारतीय संघाची निवड करण्यात आली तेव्हा पंड्या पूर्ण तंदुरुस्त आहे की नाही हेदेखील पाहिले गेले नाही. जर तो तंदुरुस्त नव्हता तर त्याला बेंगळुरुतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (एनसीए) पाठवायला हवे होते. कारण भारताचा कोणताही खेळाडू जेव्हा तंदुरुस्त नसतो तेव्हा तो एनसीएमध्ये पाठवला जातो.