टोमॅटो फेकून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
निमोणे – सध्या टोमॅटोला प्रतिकिलो 5 रुपये बाजारभाव असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. त्यामुळे काढणी खर्च परवडत नसल्याने टोमॅटो फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. टोमॅटोला केलेला खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. बाजारपेठेत कवडीमोल भाव मिळत असल्याने एकरी 1 लाख रुपयांचा फटका सहन करावा लागला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून तरकारी पिकाला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
टोमॅटोला एका एकरात नांगरणी, बेड तयार करणे, ठिबक सिंचन, रोपे लागवड, खते, औषधे तसेच माल परिपक्व होईपर्यंत अंदाजे एक लाख रुपये खर्च येत आहे.
परंतु सतत असणारे ढगाळ वातावरण आणि अवकाळी पडणारा पाऊस यामुळे यंदा टोमॅटोला प्रति दहा किलोला 50 रुपये बाजारभाव मिळत आहे. दिवसेंदिवस मजुरी वाढत असून रांजणगाव एमआयडीसीमुळे शेतात काम करण्यास मजूरही मिळत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
टोमॅटोला एकरी एक लाख रुपये खर्च केला आहे. सध्या त्याला प्रति किलो 5 रुपये बाजारभाव मिळत असल्याने मोठा आर्थिक तोटा झाला आहे. यावर्षी पाऊस भरपूर झाल्याने कोणत्याही तरकारी पिकाला जास्त बाजारभाव मिळाला नाही. कांद्याला बाजार नसल्याने अजुनही कांदा वावरातच पडून आहे. त्यात अवकाळी पावसामुळे कांद्याचेही नुकसान होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
– मनोज ओव्हाळ, शेतकरी, शिंदोडी.
यंदा पाऊस मुबलक झाला आहे. अवकाळी पाऊसही झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली आहे. परंतु सध्याचा बाजारभाव पाहता टोमॅटो बाजारात विक्रीला नेण्यापेक्षा तो फेकून देण्याची वेळ आमच्यावर आली आहे. टोमॅटोचा खर्चसुद्धा वसूल होत नसल्याने तसेच अवकाळी पावसामुळे आमच्या वावरात टोमॅटोला अक्षरशः लाल चिखल झाला आहे.
– प्रकाश शिंदे, शेतकरी, शिंदोडी.