पुणे – सुट्टीचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक महाबळेश्वर, पाचगणीसह आता कोकणाला पसंती देत आहेत. उन्हाळा असूनही कोकणातील पर्यटकांची गर्दी काहीशी वाढली असून, भाविकांच्या गर्दीने मंदिरे फुलली आहेत. एकीकडे पर्यटन, देवदर्शनचा आनंद घेताना थोडी स्वत:सह कुटुंबाची काळजी घेणे आवश्यक आहे.
सध्या उकाडा वाढत असला, तरी काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी गारवा वाढलेला आहे. यंदाच्या उन्हाळ्यात तिन्ही ऋतू एकदम सुरु असल्याचे चित्र आहे. असा परिस्थितीत उन्हाळ्यामध्ये कोकणापेक्षा कुलू-मनाली, काश्मिर, हिमाचल प्रदेश यासह महाराष्ट्राबाहेर पर्यटक फिरायला जातात. मात्र, बहुतांश पर्यटक मिनी काश्मीर महाबळेश्वरला जाण्यास पसंती दर्शवितात. तर, बदलत्या ऋतुमानामुळे यंदा उन्हाळ्यातही पर्यटक कोकणातील समुद्रकिनारे फिरण्याचा आनंद घेत आहेत.
सध्या गणपतीपुळे, तारकर्ली, मालवण, अलिबाग, काशीद, मुरुड, मुंबईतील जुहू यासह श्रीवर्धन, दिवेआगार, हरिहरेश्वर, दापोलीसह अन्य समुद्रकिनारी पर्यटक हजेरी लावत आहे.
दक्षता आवश्यक…
कोकणातील रस्ते छोटे आणि वळवळणाचे आहेत. त्यामुळे या रस्त्यावर वाहने चालवताना थोडी काळजी घ्यावी. तरुण मंडळी हुल्लडबाजी करत प्रवास करतात. मात्र, आपला धिंगाणा बेतणार नाही, याची काळजी घ्यावी. कोकणात घाट रस्त्यांमुळे रात्री प्रवास टाळावा. बहुतांश ठिकाणी मोबाइल रेंज नसते. त्यामुळे वाहन सुस्थितीत आहे ना? याची खबरदारी घेऊनच प्रवास करावा.
आरोग्याची घ्या काळजी
बाहेरचे अन्नपदार्थ खाताना ताजे आणि स्वच्छ असल्याची खात्री करावी.
उन्हातून प्रवास केल्यावर लगेच थंड पाणी पिऊ नये
लहान मुलांना उन्हाचा त्रास होणार नाही याची काळजी घ्या.
समुद्रकिनारी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या काळात जाणे टाळावे.