पुणे – चक्रीवादळामुळे मुसळधार पावसातील सातत्य आणि हवामानातील बदलाचा फटका कोकणचा राजा असलेल्या हापूसला बसण्याची चिन्हे आहेत. आंब्याचा मोहोर बहरण्याकरिता आवश्यक असलेली थंडीच कोकणात नसल्याने उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे हापूसचे यंदा बाजारपेठेतील आगमनदेखील लांबणीवर पडण्याची दाट शक्यता आहे.
गेल्या काही वर्षांत कोकणचा राजा हापूसवर बदलत्या वातावरणाचा परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. मोहोर, फलधारणा व फळांची वाढ या सर्व प्रक्रियेवर हा परिणाम दिसत आहे. हापूस आंब्याला चांगली फुले येण्यासाठी 13 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान आवश्यक आहे.
थंडीचे प्रमाण योग्य नसले, तरीदेखील त्याचा परिणाम मोहोर उशिरा येण्यावर होत असतो. याचा थेट परिणाम फळांच्या वाढीवर होत असतो. सध्या कोकणात चक्रीवादळामुळे वातावरणात बदल होत आहे. दरदिवशी बदलणारे वातावरण आंब्यासाठी हानीकारक ठरत आहे. साधारण नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कोकणातील आंब्यावर मोहोर येत असतो. मात्र, सध्या मोहोराच्या वेळी थंडीच गायब असल्याने आंबा उत्पादकांची चिंता वाढली आहे. गेल्यावर्षीदेखील वातावरणाचा फटका बसल्याने अपेक्षित उत्पादन मिळाले नव्हते.