उत्तम पिंगळे
मोबाइल बाजूला ठेवल्यावर थोडे निवांत वाटले. कोंकणातील माझा बालमित्र आहे त्याला फोन केला तर तो तसा जरा कामात होता म्हणजे म्हशींना वैरण दुसरीकडे काढलेल्या काजू बियांची मोजणी चालू होती. मला म्हणाला, तू खुशाल बोल कारण गडी माणसे कामे करत आहेत. मी त्याला प्रथम सॉरी म्हणालो. त्यावर तो चक्रावून म्हणाला, अरे फोन केला आणि सॉरी कशाला म्हणतोस? काय झाले?
मग मी त्याला सविस्तर बोललो. तुला माहीत आहे की सगळीकडे लॉकडाउन चालू आहे. बाहेर पडणे अशक्यप्राय होऊन बसले आहे. त्यावर तो म्हणाला, हो माहीत आहे. मी रोज बातम्या पाहतोय. मी त्याला म्हणालो, तुझे बरं एकदा दूध देउन आला की बाकी काही करू शकतोस. मी येथे मुंबईत स्वतःच्या फ्लॅटमध्ये अडकून पडलेलो आहे. गावात माझे घर, काही काजू, आंबा, फणसाची झाडे आहेत ते माझे चुलत काका पाहतात. गावी क्वचित जाणे होते, गणपती वा शिमगा तेही दोन एक वर्षातून एकदा.
मी त्याला सॉरी एवढ्यासाठी म्हणालो, कारण आम्ही बरोबरीचे. मी इंजिनिअरिंगसाठी बाहेर पडलो. त्याने ठरवून टाकले होते की दूध व कलमे हाच व्यवसाय करणार. चार किलोमीटरवरील एकाच ठिकाणी तालुक्यात जाऊन दूध घालून सकाळीच तो येतो. मी शहरातील कंपनीत, त्याला नेहमी म्हणायचो विशेषत: शेतकरी कर्जमाफी झाली की त्याला बोलायचो, तुमचं बरं आहे रे लोन आपोआप माफ होते तेही आम्ही भरलेल्या टॅक्समधून. त्यावर तो म्हणाला, कोकणात शेतकरी मुळात जास्त कर्ज घेत नाही. मग मी म्हणायचो की सरसकट माफी झाली की तुम्हालाही थोडे फार मिळणार ना? वगैरे. मग त्याला चिडवायला म्हणायचो, तुम्ही तसेच राहणार रे. बाहेर जगात काय चाललयं ते बघा. आज मोबाइलवरून तुम्ही पैसे भरणे, काढणे, शेअर्स घेणे, तिकीटबुक करणे, आपल्यास हवे ते सामान मागवणे सर्व काही शक्य आहे. त्यावर तो म्हणाला, बाबा रे! तुम्ही शहरातील सुधारलेले, आम्ही अडाणी. आमच्या येथे यातील काही सोयी येत आहेत पण मला काय त्याची गरज नाही. मग मी म्हणायचो रहा तसाच.
तो मनावर घ्यायचा नाही; पण आज लॉकडाउनने समजते की मी पूर्णपणे अडकलो असून तो आहे तसाच आहे. कारण दूध लागणारच. तो म्हणाला की आमचेकडे कोण येणार? कारण पक्का रस्ता नाही. लाइटही सतत जात असते. मी त्याला म्हणालो, पण तू तर खुल्या हवेत जगत आहेस. येथे पुढे काय होणार ते काही समजत नाही आणि तुला सतत गावंढळ म्हणून हिणवायचो त्याचा मला पश्चाताप झाला आणि म्हणून मी फोन सॉरी साठी केला व फोन ठेवलाही. पाच मिनिटांनी त्याचा फोन आला. गावचा कच्चा रस्ताही बंद केला आहे पण तुला येथे यायचे असल्यास तू येऊ शकतोस.
वेशीबाहेरच आम्ही तंबू ठोकलेले आहेत. तेथे गावातील बचत गटांनी जेवण पाण्याची सोय केली आहे. दोन आठवडे तेथे राहून तू ठीक असलास तर गावात राहू शकतोस. माझ्याकडे खाण्यापिण्याची व्यवस्था नक्कीच होईल. सर्व लॉकडाउन वगैरे मिटल्यावर जाऊ शकतोस. मी त्याचे आभार मानले व फोन ठेवला. क्षणात माझ्यासमोर बा. भ. यांच्या ओळी आल्या “निळ्या खाडीच्या काठाला, माझा हिरवाच गांव. जगात मी मिरवितो, त्याचे लावूनिया नाव’. पण प्रश्न असा आहे की मी बाहेर पडणार कसा?