पुणे : राजस्थामधील जोधपूरजवळील खाटावास गावातून पुण्यासारख्या शहरात येत, खडतर संघर्ष करत माझे वडील कै. रामगोपाल चतुर्भूज पुंगलिया यांनी येथील व्यवसाय क्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण केली. हे करत असताना व्यवहारमूल्य जपत, अपयशाला यशात परिवर्तीत करत, स्वत:बरोबरच आपल्या जवळच्या व्यक्तींनाही पुढे नेण्याचा त्यांनी नेहमीच प्रयत्न केला.
वडिलांची शिकवण, त्यांचे आचरण आणि त्यांचे विचार आत्मसात करत मी माझ्या आयुष्यात यशस्वीपणे वाटचाल करू शकलो. त्यामुळे माझे वडील हेच माझ्यासाठी खऱ्या अर्थाने फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड आहेत, अशी भावना श्री तिरूपती नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष जुगलकिशोर पुंगलिया यांनी व्यक्त केली.
जागतिक फादर्स डे निमित्त प्रभात’ने पुंगलिया यांच्याशी संवाद साधला. यावेळी आपल्या वडिलांबाबतच्या आठवणी सांगताना पुंगलिया म्हणाले,”” माझे वडील त्यांच्या वयाच्या केवळ सातव्या-आठव्या वर्षीच पुण्याला आले. त्याकाळी आजसारखे कर्मचाऱ्यांना आदरपूर्वक वागणूक दिली जात नसत, उलट त्यांना नोकर म्हणून हिणावले जाई.
वडिलांना देखील अशा अपमानजनक वागणुकीचा सामना करावा लागला. मात्र त्यामुळे खचून न जाता त्यांनी अधिक परिश्रम घेतले आणि पुढे चालून स्वत:चा व्यवसाय सुरू केला. हे करताना आपली कौटुंबिक जबादारीदेखील त्यांनी समर्थपणे पार पाडली.
अपयशाचे यशात परिवर्तन करण्याची त्यांची जीद्द अफाट होती. याचे उदाहरण द्यायचे म्हणजे वडील पुण्यात राहत असताना त्यांची आर्थिक स्थिती हलाखीची होती. स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू केला असता दुकानात विकण्यासाठी साखर हवी असताना त्याकाळी साखरेचा कोटा काही दुकानदारांनाच मिळत असल्याने साखरेचा शासकीय कोटा असलेल्या दुकानदाराकडे साखर घेण्यासाठी गेल्यावर दुकानदाराने त्यांचा अपमान करून “तुही साखर घेण्यात आलेल्या लोकांप्रमाणे रांगेत उभे रहा’ असे सांगितले. त्यावर वडिलांनी चिडून एक दिवस तुलाच रांगेत उभे करेन, असे सांगितले.
त्यानंतर त्यांनी जिद्दीने रेशन दुकानाचा परवाना मिळविला. यासाठी तत्कालीन आमदार मा. बाबुरावजी सणस यांची बहुमोल साथ त्यांना लाभली आणि खरोखरच संबंधित दुकानदारास रेशनच्या सरकारी परवाना मिळाल्यावर सर्वप्रथम माल देऊन आपल्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. अशीच बाब आमच्या श्री तिरुपती नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्थापनेबाबतही सांगता येईल.
मी महेश नागरी सहकारी बॅंकेची निवडणूक काही मतांनी हरल्यानंतर वडिलांनीच मला स्वत:ची संस्था सुरू करण्याबाबत प्रेरणा दिली आणि 19 ऑक्टोबर 1999 रोजी छोट्याशा जागेत स्थापन केलेली पतसंस्था पुण्यातील 180 कोटीच्या वर मिश्र व्यवसाय असणारी व महाराष्ट्र शासनाचा सहकारभूषण मिळविणारी पुणे विभागातील पहिलीच पतसंस्था ठरली आहे.
केवळ या पतसंस्थेचा संस्थापक अध्यक्ष म्हणून नव्हे, तर महेश सहकारी बॅंकेत उपाध्यक्ष म्हणून तसेच अनेक सामाजिक संस्थेत महत्त्वाच्या पदावर मी कार्यरत आहे. याचे सर्व श्रेय माझ्या वडिलांना जाते.