– शर्मिला जगताप
त्सु चेनचू रोज पहाटे लवकर उठून शिकारीला जात असे. भटकंती आणि शिकार करणे त्याला फार आवडत असे. तो दिसायला एखाद्या जंगली जनावरासारखाच होता. लालबुंद डोळे, रागीट चेहरा, भलेमोठे कान आणि भुवया तर तलवारीसारख्या लांबसडक.
डोक्यावर भलेमोठे पागोटे बांधलेले असायचे. तो शिकारीला निघाला की, डाव्या खांद्यावर बाण असलेली पिशवी लटकवयाचा आणि उजव्या हातात धनुष्य पकडायचा, कमरेला एक फडके बांधून त्यात शिकारीसाठीचा सुरा अडकवायचा.
एके दिवशी त्सु चेनचू भल्या पहाटे शिकारीसाठी घराबाहेर पडला. नुकताच सूर्य उगवत होता. त्यामुळे त्याच्या सोनेरी किरणांनी संपूर्ण अरण्य, पर्वत चकचकीत दिसायला लागले. सगळीकडे शांतता होती. त्सु चेनचू जंगलात गेला आणि शिकारची वाट पाहात बसला. तेवढ्यात एक पिवळसर तपकिरी रंगाचे हरणाचे पाडस हळूहळू जात असल्याचे त्याने पाहिले आणि लगेच हातातील बाण पाडसाकडे सोडला.
बाण पोटात घुसल्याने ते पाडस खाली पडले. दूरवर त्याची आई उभी होती. धावत ती त्याच्याकडे आली आणि आपल्या पाडसाची जखम जिभेने साफ करू लागली. तिच्या डोळ्यातील अश्रू काही थांबत नव्हते. ती मोठ्याने हंबरडा फोडत होती. आपलं पाडस मेलेलं पाहून तीसुद्धा खाली पडली आणि जिने प्राण सोडला.
हे दूरवर बसलेला त्सु आश्चर्यचकित होऊन पाहात होता. हे दृश्य पाहून तो घाबरला. त्याला मोठा धक्का बसला. हे असे का झाले, म्हणून त्याने कमरेचा सुरा काढला आणि पाडसाच्या आईचे पोट फाडले. त्याला पाहायचे होते की हरीण का मेले?
आईच्या पोटात त्सुने पाहिले की, काळजाचे तुकडे तुकडे झाले होते. आपल्या पाडसाला मरताना पाहून त्या आईचे काळीज फाटल्याने तिने प्राणाचा त्याग केला, हे त्याला समजले. त्याला खूप वाईट वाटले. तो ढसाढसा रडू लागला. त्याला स्वतःचाच राग आला.
तो उठून उभा राहिला. आपले धनुष्यबाण तोडले आणि फेकून दिले. यापुढे आपण शिकार करणार नाही अशी शपथ घेऊन तो निघून गेला. (जपान देशातील लोककथेचा अनुवाद)