मुंबई – बॉलीवूड (Bollywood) अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा आज 81 वा वाढदिवस आहे. देशातच नाही तर जगभरात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र आपल्या अभिनयाने आणि स्टाइलमुळे स्वत:ची अशी खास ओळख निर्माण करणारे अमिताभ बच्चन यांनी अथक परिश्रम आणि मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केले आहे. अभिनयासह त्यांच्या वक्तशीरपणामुळे देखील ते अधिक करून ओळखले जातात.
मात्र सुप्रसिद्ध अभिनेता अशी ओळख निर्माण करण्यापूर्वी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला होता. फिल्मी करिअरमध्ये त्यांनी अनेकदा अपयशाचा सामना केला आहे. करिअरच्या सुरुवातीच्या काळात बिग बींनी आपल्या करिअरची सुरूवात व्हॉइस आर्टिस्ट म्हणून केली होती. आज चाहत्यांना वेड लावलेल्या त्यांच्या आवाजामुळेच ऑल इंडिया रेडिओने त्यांना नाकारले होते. 1969 मध्ये मृणाल सेन यांच्या ‘भुवन शोम’ या चित्रपटात व्हॉइस आर्टिस्ट म्हणून त्यांनी चित्रपटसृष्टीत एन्ट्री केली.
अमिताभ बच्चन यांच्यावर 90 कोटी रुपयांचे होते कर्ज
1999 मध्ये अमिताभ बच्चन यांनी एक प्रोडक्शन हाऊस सुरू केले होते. ज्याच्या बॅनरखाली त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली होती. पण दुर्दैवाने सगळेच चित्रपट फ्लॉप झाले. त्यामुळे अमिताभ बच्चन यांच्या कंपनीवर 90 कोटी रुपयांचे कर्ज झाले. त्यांची कंपनी ABCL (अमिताभ बच्चन कोऑपरेशन लिमिटेड) बंद होणार होती. त्याच्याकडे ना कोणत्याही खास चित्रपट किंवा इतर कोणतेही काम होते जिच्या मदतीने तो कर्ज फेडू शकेल. खुद्द अमिताभ यांनी अनेक मुलाखतींमध्ये याचा उल्लेख केला आहे. त्यांच्या मते, त्यांच्या 44 वर्षांच्या कारकिर्दीतील हा सर्वात वाईट आणि भयंकर काळ होता.
त्यानंतर अमिताभ बच्चन यश चोप्रांकडे काम मागण्यासाठी गेले आणि यशजींनी त्यांना मोहब्बतेंमध्ये महत्त्वाची भूमिका दिली. पण अमिताभ यांच्यावर जेवढे कर्ज होते, त्यासाठी केवळ मोहब्बतेंमध्ये भूमिका मिळणे पुरेसे नव्हते. यानंतर बिग बींना टीव्हीवर ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो ऑफर करण्यात आला. अमिताभ ज्यावेळी लोकांना करोडपती बनण्याची संधी देत होते, त्याचवेळी ते स्वत: कर्ज आणि आर्थिक संकटातून बाहेर पडत होते. केबीसी हा त्याच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा भाग असून ते नेहमीच असेल असे त्यांनी अनेकदा सांगितले.