पुणे – राज्यातील तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत पावसाची तूट, उपलब्ध भूजलाची कमतरता आणि पेरणीखालील क्षेत्र व पिकांची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करून राज्यातील 15 जिल्ह्यांतील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये 24 तालुक्यांमध्ये गंभीर तर 16 तालुक्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील पुरंदर, बारामती, शिरूर, दौंड आणि इंदापूर या पाच तालुक्यांचा समावेश आहे.
दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यातील कोरडवाहू पीक घेतलेल्या व 33 टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेया खातेदारांना शेतकऱ्यांना कृषी विषयक मदतीसाठी बियाणांसाठी अनुदान मिळेल. या मदतीचे वाटप 2023 च्या खरीप हंगामातील सातबारा मधील पिकांच्या नोंदीच्या आधारे करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. याचसह दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या तालुक्यातील शाळांमध्ये मध्यान्ह भोजन योजना दिर्घ सुट्टीच्या कालावधीत देखील राबविण्यात यावी, तसेच मध्यान्य भोजन योजना व एकात्मिक बालविकास योजनेतंर्गत मुलांना पौष्टिक अन्न देण्यात यावे, असे आदेश शासनाने दिले आहेत, याबाबतचा शासन निर्णय महसुल व वन विभागाचे उपसचिव संजय धारुरकर यांनी जारी केला आहे.
मिळणार या सवलती
- जमीन महसुलात सूट; पीक कर्जाचे पुनर्गठन
- शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती
- कृषीपंपाच्या चालू वीजबिलात 33.5 टक्के सूट
- शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी
- रोहयो अंतर्गत कामाच्या निकषांत काही प्रमाणात शिथिलता
- आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टॅंकर्सचा वापर
- शेती पंपाची वीज जोडणी खंडित न करणे