हिंगोली (शिवशंकर निरगुडे) – देशात बेकायदा धर्मांतरण अन लव्ह जिहाद प्रकाराला आळा घालण्यासाठी कठोर कायदा करण्याच्या मागणीसाठी वसमतमध्ये सकल हिंदू समाजाच्यावतीने हिंदू धर्मरक्षणासाठी रविवारी (ता. 4) काढण्यात आलेल्या मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला. हजारो आंदोलक या मोर्चात सहभागी झाले होते. मोर्च्याच्या समर्थनार्थ व्यापाऱ्यांनीही बाजारपेठ कडकडीत बंद ठेवली. वसमत येथे आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सुरवात करण्यात आली. यावेळी गुरुपादेश्वर शिवाचार्य स्वामी, महंतय्या महाराज थोरावेकर, चैतन्य भारती महाराज, कल्याण गिरी महाराज, नागनाथ महाराज चव्हाण, नागबाबा महाराज कुंजापुरी, नागबाबा रोशनगिरी महाराज यांच्यासह नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या या मोर्च्यात महिला, तरुणी व युवकांची संख्या लक्षणीय होती. सदर मोर्चा तहसील कार्यालयावर आल्यानंतर त्या ठिकाणी प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले. मागील काळात अनेक प्रलोभने दाखवून हिंदूंचे धर्मांतरण करण्यात आले आहे. हिंदू मुलींना प्रेमाच्या जोळ्यात ओढून त्यांचे बळजबरीने धर्मांतरण करण्याचा प्रकार सुरु आहे. लव्ह जिहादच्या नावाखाली अनेक मुलींना पळवून नेलेल्या मुलींची हत्या करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकाराला आळा घालण्यासाठी लव्ह जिहाद विरोधी कायदा करावा. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करावी. अशी प्रकरणे हाताळण्यासाठी स्वतंत्र न्यायालयाची स्थापना करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याशिवाय दिल्ली येथील श्रध्दा वालकर खून प्रकरण जलदगतीने न्यायालयात चालवून आफताब पुनावाला यास फाशी द्यावी अशी मागणीही निवेदनाद्वारे यावेळी करण्यात आली आहे.