पाथर्डी – नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना अडथळा ठरणारे शहरातील मुख्य मार्गावरील अतिक्रमणे हटविण्यास स्थानिक प्रशासनाकडून सुरुवात झाली आहे. पालिका प्रशासनाबरोबर पोलीस प्रशासनही मोहिमेत सहभागी झाले होते.
नवरात्रोत्सव नियोजनासंदर्भात श्रीक्षेत्र मोहटा देवी गडावर नुकतीच बैठक झाली. या बैठकीत पायी येणाऱ्या भाविकांच्या अडचणी संदर्भात चर्चा होऊन पायी भाविकांना अडथळा ठरणारे शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व जिल्हा पोलीसप्रमुख राकेश ओला यांनी स्थानिक प्रशासनाला दिल्या. नवरात्रोत्सव काळात शहरातील वसंतराव नाईक चौकापासून चिंचपूर रोड पायी भाविकांसाठी राखीव ठेवला जातो. शहरातून या रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहनाला बंदी करण्यात येते.
मात्र, या रस्त्यावर फळविक्रेत्यांच्या हातगाडी व छोट्या व्यावसायिकांची पथारी दुकाने अशा अतिक्रमणांमुळे रस्त्यावर भाविकांना चालणे मुश्किल होते. घटस्थापना, तिसरी माळ, पाचवी, सातवी माळ यावेळेस तर दर्शनासाठी भाविकांचा महापूर लोटतो. शहरातून विशाखापट्टणम महामार्ग, बारामती-औरंगाबाद महामार्ग जात असल्यामुळे मोहटा देवीच्या भाविकांची वाहने व महामार्गावरील वाहने यामुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी होते. टपरीधारक, हातगाडी, फळविक्रेते रस्त्यावरच आपले हातगाडे लावत असल्याने तासन्तास वाहतुकीची कोंडी होते. या पार्श्वभूमीवर अनुचित घटना होऊ नये यामुळे कारवाई करण्यात आली.
शहरातील नाईक चौक, अजंठा चौक, आंबेडकर चौक या ठिकाणी प्रचंड गर्दी असते. स्थानिक प्रशासनाकडून या परिसरातील अतिक्रमणे हटविली. टपरीधारकांचे रस्त्यावरील बांधलेले ओटे उखडून टाकण्यात आले. तसेच फळविक्रेते, हातगाडीधारक, रस्त्यावरील बेशिस्तपणे लावलेली वाहनेदेखील हटविण्यात आली. पोलीस प्रशासनातर्फे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, उपनिरीक्षक सचिन लिमकर, सहायक फौजदार सुरेश बाबर, पोलीस नाईक राम सोनवणे, नीलेश म्हस्के, विनोद मासाळकर, विजय काळोखे सहभागी झाले होते. पालिका अतिक्रमण विभागाचे स्वच्छता निरीक्षक दत्तात्रय ढवळे, सहभागी झाले होते.