श्री रविदासजी महाराज शिरसाठ, आळंदी
म्हणोनि अविद्यानिमित्ते । दृश्य द्रष्टृत्व वर्ते ।
ते मी नेणे आईते । ऐसेचि असे ।।8 ।।
म्हणून अद्वैत तत्त्वज्ञानाचे संस्कार नसणाऱ्या सामान्य जनांना परमात्मा व जगत यामध्ये दिसत असलेल्या द्वैताची अर्थात भिन्नत्वाची संगती लावण्यासाठी, अज्ञानवाद्यांकडून नसलेल्या अविद्येचा स्वीकार केला जातो आणि तिचे कार्य असणाऱ्या द्रष्टा-दृश्य-दर्शन या त्रिपुटीमुळे द्वैताची प्रतीती येते, असे सांगितले जाते.
परंतु शुद्ध, निरूपाधिक ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी, अविद्यमान अविद्येचा काल्पनिक संबंध मानून, दृश्यद्रष्टभावाची संगती लावण्याचा जो प्रयत्न केला जातो, त्याबद्दल माऊली “ते मी नेणे’ म्हणजे “ते मी जाणत नाही’, अर्थात ते अयुक्त असल्याने मी ते मानत नाही, असे निर्भीडपणे म्हणतात.
ज्ञानोबारायांचा जगद्विषयक सिद्धांत हा सांख्याचा “परिणामवाद’ आणि वेदांताचा “विवर्तवाद’ यापेक्षा भिन्न असल्याचा दिसून येतो. त्यात कारण आणि कार्य दोन्ही समान सत्तेतील असून एकरूपच आहेत. म्हणून या सिद्धांतास “चिद्विलासवाद’ असे नाव आहे.
यात अविद्या संबंधाशिवाय केवळ परब्रह्मच आहे आणि तेही “आईते ऐसे’ म्हणजे निरूपाधिक असे आहे.
– चांगदेवपासष्टी तत्त्वचिंतन (भाग – 9)