आतां विश्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञें तोषावें । तोषोनि मज द्यावे । पसायदान हें ।। जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो । भूतां परस्परे पडो । मैत्र जीवांचे ।। माऊलींनी ज्ञानेश्वरीची सुरुवात ईश्वराच्या आद्य रुपास आणि वेदांच्या निर्मात्यास स्मरून केली.
ओम नमोजी आद्या… वेद प्रतिपाद्याजय जय श्री संवेद्या… तसेच ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या (ओवी 1794 ते 1802) 18 व्या अध्यायाचे समापन “पसायदान’ या अनंतसाधारण प्रार्थनेने केले.
या विश्वात्मक (विश्वाच्या कणा कणांमध्ये भरून राहिलेल्या) माझ्या भगवंता, माझ्या वाणीचा यज्ञ तुझ्या कृपेमुळे अखंड चालू आहे. त्या यज्ञाला आपण प्रसन्न व्हावे आणि मला हे प्रसादाचे दान द्यावे.
मग ऐक माझे मागणे. या जगामध्ये जे काही वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत, त्यांच्यातल्या त्या वाईट प्रवृत्तीचा नाश कर. कारण कुठलाही मनुष्य हा कधी वाईट नसतो त्याचे गुण वाईट असू शकतात.
तू फक्त तेच काढून टाक आणि दुष्प्रवृत्ती काढून टाकल्यावर त्यांच्या सत्कर्मामध्ये वाढ कर. हे जर केलेस तर नक्कीच या पृथ्वीतलावरील सर्व जीव प्रेममय होऊन जातील.