संतोष पवार
सातारा – शाहूपुरी ग्रामपंचायतीस करांमधून लाखो रुपयांचा महसूल मिळतो. 14 व्या वित्त आयोगातून लाखो रुपये विविध योजनांसाठी सरकार देत असले तरी शाहूपुरीत अनेक योजना नावालाच उरल्या होत्या. नगरपंचायतीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या शाहूपुरीत अद्याप मूलभूत सुविधांची वानवा आहे. स्वच्छतेचे तर शाहूपुरीला ग्रहण लागलेले असून सांडपाणी व्यवस्थापनाचाही पुरता बोजवारा उडाला आहे. ग्रामपंचायत हद्दीतील गटारे मोडकळीस आली आहेत. अनेक वसाहतींमध्ये गटारे नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.
शाहूूपुरी ग्रामपंचायतीचा विस्तार वाढत आहे. मूळ शाहूपुरी म्हणूून विकसित झालेल्या वसाहतींमध्ये त्यावेळी सांडपाणी व्यवस्थापनाकडे लक्ष देण्यात आले होते. अनेक ठिकाणी गटारे बांधण्यात आली. मात्र, त्यांची साफसफाई वेळच्या वेळी होत नाही. अनेक ठिकाणी रस्त्यावरून गटारगंगा वाहते. अनेक ठिकाणी गटारे मोडकळीस आली आहेत. अशी भयानक परिस्थिती असतानाही या समस्येकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. पूर्वी ग्रामपंचायतींना निधीची कमतरता होती. आता ग्रामपंचायतींना थेट निधी दिला जात आहे. 14 व्या वित्त आयोगातून लाखो रुपयांचा निधी मिळत असतानाही लोकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याने शाहूपुरीवासीयांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
गडकर आळी, समता पार्क, एलआयसी कॉलनी, गेंडामाळ नाका ते शाहूपुरी चौक, स्वामी समर्थ मठ ते मुख्य रस्ता, आंबदेरे रोड लगतची गटारे, आदर्श कॉलनी, रेणुका सोसायटी, मोळाचा ओढा, आझादनगर, गंगासागर कॉलनी आदी वसाहतींमध्ये गटारे मोडकळीस आली आहेत. अनेक ठिकाणी गटारांची सफाई वेळच्या वेळी होत नसल्याने ती भरून वाहत आहेत. वास्तविक ग्रामपंचायत गटारांच्या कामांवर वारंवार खर्च करत असताना गटारे काही महिन्यातच मोडकळीस येतात कशी, असा प्रश्न निर्माण होतो. ग्रामपंचायतीतील सत्ताधारी व विरोधकांनी शाहूपुरीच्या विकासासाठी एकजुटीने पुढे येण्याची गरज आहे. मात्र, सत्ताधारी आम्हाला विश्वासात घेत नसल्याचा आरोप विरोधी सदस्यांकडून नेहमीच होत आहे.
गडकर आळी, मोळाचा ओढा, आंबेदरे रोड आदी ठिकाणी गटारांची साफसफाई होत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. या गटारांमध्ये डुकरांचा धुडगूस सुरू असतो. त्यामुळे स्वाइन फ्ल्यूसारखे साथीचे आजार होण्याचा धोका आहे. नागरिकांना अनेक ठिकाणी नाकावर रुमाल धरून जाण्याची वेळ येते, हे शाहूपुरीसाठी भूषणावह नाही. ग्रामपंचायतीने सर्व गटारांची पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याची गरज आहे. जंतुनाशकांची फवारणी केल्यास रोगराईला आळा
बसेल.
नवीन वसाहतींकडे दुर्लक्ष
शाहूपुरी ग्रामपंचायतीचा विस्तार मोठा असून अनेक वसाहतींमध्ये गटारे नाहीत. परिणामी घरांमधील सांडपाणी थेट रस्त्यावर येत असल्याने आरोग्याचा प्रश्न बिकट होत आहे. यातून वादावादी होत आहे. आंबेदरे रोडलगत अनेक नव्या वसाहती झाल्या आहेत. त्यांच्यामुळे ग्रामपंचायतीच्या महसुलात मोठी वाढ झाली असली तरी त्यांच्याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष आहे. तेथे कोणत्याच सोयीसुविधा पुरविल्या जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. या सुविधा ग्रामपंचायतीने पुरवाव्यात, अशी मागणी होत आहे.