मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती वाधवान यांना लॉकडाउनदरम्यान प्रवासासाठी विशेष परवानगीचे पत्र कोणाच्याही दबावाविना आपणच दिल्याचे सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेले गृह विभागाचे मुख्य सचिव अमिताभ गुप्ता यांनी कबूल केले आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. या प्रकरणाचा चौकशी अहवाल आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
याविषयी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फेसबुकलाईव्हद्वारे संवाद साधत माहिती दिली. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या राजकारणावरून देशमुख यांनी टीकाही केली.
देशमुख म्हणाले, या सर्व प्रकरणामध्ये अमिताभ गुप्ता यांच्या चौकशीसाठी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी केलेल्या चौकशीचा अहवाल प्राप्त झाला आहे.
या अहवालानुसार लॉकडाउनच्या काळात वाधवान कुटुंबीयांना मुंबईहून महाबळेश्वर जाण्यासाठी मंत्रालयातून जे पत्र देण्यात आले होते, स्वतः आपणच दिल्याचे अमिताभ गुप्ता यांनी कबूल केले आहे. हे देताना त्यांच्यावर कुणाचाही दबाव नव्हता, असेही त्यांनी चौकशीत म्हटले आहे. या प्रकरणाची फाईल तयार होईल आणि ती मुख्यमंत्र्यांकडे पाठवली जाईल. त्यानंतर यावर निर्णय होईल. त्याचबरोबर हा चौकशी अहवाल पुढील काळात सार्वजनिक करण्यात येईल, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही आजच्या परिस्थिती राजकारण बाजूला ठेवून लढले पाहिजे, असे म्हणाले होते. असे असताना काही मंडळी, त्यामध्ये ग्रामपंचायत स्तरावरचं किंवा नगर पालिका स्तरावर राजकारणं करणारा मी समजू शकतो. पण, ज्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व केले, असे लोक सुद्धा जेव्हा या पद्धतीने राजकारण करतात, ही अतिशय दुखद अशी गोष्ट आहे, असा टोला गृहमंत्री देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता लगावला.