आठ हजाराचा टप्पा पार
– 19 करोना बाधित रूग्णांचा मृत्यू
मुंबई : करोनाचा फैलाव वाढतच चालला असून राज्यात काही दिवसांत करोना रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. गेल्या चोवीस तासात राज्यात 440 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 19 करोनाबाधितांचा मृत्यू झाला असून मृत्यूंपैकी 12 मुंबईत, 3 पुण्यात, 2 जळगाव, तर सोलापूर आणि लातूर येथे प्रत्येकी एक जणाचा मृत्यू झाला आहे.
अनेक उपाययोजना करूनही लोकांचा सार्वजनिक ठिकाणचा वावर बंद होत नसल्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. गेल्या चार दिवसांपासून राज्यातील करोनाबधित रुग्णांच्या संख्येत रोज शंभरपेक्षा अधिक नव्या रुग्णांची भर पडते आहे. गेल्या 24 तासात 440 करोनाचे रुग्ण मिळाले आहेत. यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 8 हजार 68 झाली आहे.
आज झालेल्या मृत्यूंपैकी 11 पुरुष, तर 8 महिला आहेत. आज झालेल्या 19 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 7 रुग्ण आहेत. वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील 10 रुग्ण, तर 40 वर्षांखालील 2 रुग्ण आहेत. या 19 मृत्यूंपैकी 4 रुग्णांच्या इतर आजारांबाबत माहिती अद्याप मिळालेली नाही. उर्वरित 15 रुग्णांपैकी 11 जणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, क्षयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड 19 मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 342 झाली आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 1,16,345 नमुन्यांपैकी 1,07,519 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 8068 जण पॉझिटिव्ह आले आहेत.