Gujarat Rain : गुजरातमधील विविध भागात रविवारी अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली दरम्यान, या पावसात वीज पडून 20 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. एका अधिकाऱ्याने आज सकाळी ही माहिती दिली. स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर (SEOC) च्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गुजरातच्या वेगवेगळ्या भागात पावसामुळे झालेल्या अपघातांमध्ये आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
गुजरातच्या दाहोद जिल्ह्यात चार, भरूचमध्ये तीन, तापीमध्ये दोन आणि अहमदाबाद, अमरेली, बनासकांठा, बोटाड, खेडा, मेहसाणा, पंचमहाल, साबरकांठा, सुरत, सुरेंद्रनगर आणि देवभूमी द्वारका येथे प्रत्येकी एक जण मरण पावला, असे एसईओ अधिकाऱ्याने सांगितले.
गुजरातमध्ये एकाच दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करत “गुजरातच्या विविध शहरांमध्ये खराब हवामान आणि वीज पडून अनेक लोकांचा मृत्यू झाल्याच्या बातमीने मला खूप दु:ख झाले आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्या अपूरणीय नुकसानाबद्दल मी मनापासून शोक व्यक्त करतो. स्थानिक प्रशासन मदतकार्यात गुंतले आहे. जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो.असे म्हटले आहे.
सोमवारी पाऊस कमी होण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने (IMD) म्हटले आहे. SEOC ने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी गुजरातमधील 252 पैकी 234 तालुक्यांमध्ये पाऊस झाला. सुरत, सुरेंद्रनगर, खेडा, तापी, भरूच आणि अमरेली जिल्ह्यात १६ तासांत ५०-११७ मिमी पावसाची नोंद झाली, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आणि पिकांचे नुकसान झाले. राजकोटच्या काही भागात गारपीट झाली.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, पावसामुळे पिकांच्या नुकसानाव्यतिरिक्त, सौराष्ट्र विभागातील मोरबी जिल्ह्यातील कारखाने बंद झाल्यामुळे सिरेमिक उद्योगावरही परिणाम झाला आहे. आयएमडीच्या अहमदाबाद केंद्राच्या संचालक मनोरमा मोहंती यांनी सांगितले की, सोमवारी पाऊस कमी होईल आणि दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्र जिल्ह्यांतील काही भागांमध्ये तो केंद्रित होईल.