सातारा – जिल्ह्यातील अनेक गावांबाहेर व शहरांबाहेर महामार्ग व इतर रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जातो. अशा प्रकारे कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करा, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सोमवारी दिल्या. कचरा टाकणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यासाठी फिरत्या पथकांची स्थापना करा, अशी सूचनाही त्यांनी केली.
गावठाणाबाहेर ग्रामीण मार्ग, इतर ग्रामीण मार्ग, मुख्य जिल्हा मार्ग, राष्ट्रीय महामार्गावर टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठक झाली. त्यावेळी श्री. देसाई बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, परिविक्षाधिन
जिल्हाधिकारी चंद्रा, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी क्रांती बोराटे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी, मुख्याधिकारी उपस्थित होते. शंभूराज देसाई म्हणाले, “”नागरिकांना गावाबाहेर कचरा टाकण्याची लागलेली सवय मोडणे गरजेचे असून अशा लोकांवर कारवाई करण्यासाठी फिरत्या पथकांची स्थापना करावी.
ज्याप्रमाणे ग्रामस्वच्छता अभियानामध्ये गुडमॉर्निग पथक तयार करण्यात आले होते. त्या धर्तीवर हे पथक असावे. ग्रामीण भागात गट विकास अधिकारी आणि शहरी भागात मुख्याधिकाऱ्यांनी कडक कारवाई करावी. कारवाईचा अहवाल रोजच्या रोज घेण्यात यावा. नगरपालिका क्षेत्रातही याचे प्रमाण मोठे आहे. त्याची गांभीर्याने दखल घेऊन कार्यवाही करावी.” टाकल्या गेलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची कार्यवाही करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने नियोजन करावे.
प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प कार्यान्वित केलेले आहेत. ज्याठिकाणी हे प्रकल्प कार्यान्वीत केले नाहीत तेथे लवकरात लवकर प्रकल्प सुरू करण्याची कार्यवाही करावी. लोकांनीही अशा प्रकारे कचरा रस्त्याच्या कडेला टाकू नये, असे आवाहनही श्री. देसाई यांनी यावेळी केले.