पुणे, दि. 19 -छत्रपतींचा स्वराज्याचा आणि देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास जनतेसमोर उभा करण्याचे काम पुरातत्व विभागाकडून व्हावे. शासन ऐतिहासिक वास्तू, किल्ल्यांच्या जतन कार्याबाबतीत अतिशय गंभीर असून त्यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
जागतिक वारसा सप्ताहानिमित्त पुरातत्व विभाग पुणे प्रादेशिक कार्यालयामार्फत यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कलादालनात आयोजित राज्य संरक्षित स्मारकांच्या जतन व दुरुस्ती कामांचे छायाचित्र प्रदर्शन भरविले. त्याचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी पुरातत्व सहायक संचालक डॉ. विलास वाहणे, नगररचना अधीक्षक अभियंता हर्षदा शिंदे आदी अधिकारी उपस्थित होते. जुन्या वारशांचे शोधकार्य, त्याचे जतन आणि अभिमान म्हणून समोर मांडणे हे काम या प्रदर्शनातून होईल, असे सांगून पाटील म्हणाले, राज्यातील मजबूत, सुरक्षित किल्ल्यांचे श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांना जाते. ते समोर आणण्याचे काम विभागाने करावे. या विषयाबद्दल समाजात कुतूहल असून या क्षेत्रात अजून खूप शोध घेऊन काम करण्याची गरज आहे. या प्रदर्शनात राज्य संरक्षित स्मारके, गड किल्ले यांचे जतन व दुरुस्ती कामांची छायाचित्रे, किल्ल्यांचे त्रिमितीय रेखांकन (थ्री-डी मॅपिंग) यांची छायाचित्रे, आराखडे पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.