राजगुरूनगर -हुतात्मा राजगुरू यांच्या 112 व्या जयंती निमित्ताने राजगुरूनगर येथील एसटी स्टॅंडजवळील हुतात्मा भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या पुतळ्यास माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रांताधिकारी संजय तेली, तहसीलदार सुचित्रा आमले, शिवसेनेच्या जिल्हा संघटक विजया शिंदे, ऍड. मुकुंद आवटे, कोंडीभाऊ टाकळकर आदी मान्यवर उपस्थित होते. हुतात्मा राजगुरू यांचे जन्मस्थान असलेल्या राजगुरूवाड्यावर खेड ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. हुतात्मा राजगुरू स्मारक समितीचे सुशील मांजरे, संदीप वाळुंज, शैलेश रावळ, विठ्ठल पाचारणे, मंडल अधिकारी सविता घुमटकर यावेळी उपस्थित होत्या.
आढळराव पाटील म्हणाले की, इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून अखंड भारत देशाला मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्यवीरांनी अनेक यातना सहन केल्या. संकटकाळात या योगदानाचे स्मरण करा आणि स्वत:सह समाजाचे हित जोपासण्याचे ध्येय निश्चित करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.