केरळ सरकारचा ठराव एकमताने मंजूर : भाजपनेही दिला पाठिंबा
तिरुअनंतपुरम – जयपूर, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरम विमानतळांचे खासगीकरण करत ते अदानी समूहाला देण्याचा निर्णय केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच जाहीर केला. या निर्णयास केरळ सरकारने विरोध दर्शविला असून यासंदर्भात एकमताने ठराव देखील मंजूर केला आहे. विशेष म्हणजे, या ठरावाला भाजपनेही पाठिंबा दर्शविला आहे. यामुळे केंद्र सरकारविरोधात केरळ सरकारने दंड थोपटले असल्याचे दिसून येत आहे.
केरळ विभानसभेने सोमवारी तिरुअनंतपुरम विमानतळाच्या देखभाल आणि हाताळणीचे कंत्राट अदानी उद्योग समूहाला देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात एकमताने ठराव संमत केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी या निर्णयाबद्दल केंद्र सरकारने फेरविचार करावा, असे म्हटले आहे. राज्य सरकारने विमानतळाच्या कारभारातील काही वाटा अदानी समूहाला देण्याची तयारी दर्शवलेली असतानाही केंद्राने हे विमानतळ खासगी कंपनीच्या माध्यमातून चालवण्याचा निर्णय अयोग्य असल्याचे विजयन यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री विजयन यांनी विमातळाबद्दल राज्य सरकारची भूमिका कायमच स्पष्ट होती असे सांगितले. विजयन यांनी सरकारची बाजू मांडल्यानंतर विधानसभेचे स्पीकर पी. श्रीरामकृष्णन् यांनी एकमताने ठराव संमत केला जात असल्याची घोषणा केली. मात्र यानंतर भाजपाने सभागृहाबाहेर सोनं तस्करी प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी आंदोलन केले. तसेच हा ठराव एकमताने संमत करताना भाजपाचा सभागृहातील एकमेव सदस्य असणाऱ्या ओ. राजगोपालन यांनी आपल्याला बोलू दिले नाही, असे म्हटले आहे. मात्र भाजपाचे केरळमधील प्रमुख नेते के. सुदर्शन यांनी विमानतळ विषयासंदर्भात आम्ही राज्याच्या जनतेसोबत आहोत, असे प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.
दरम्यान, विधानसभेचे विरोधीपक्ष नेते रमेश चेन्नईथाला यांनीही राज्य सरकारच्या या ठरावाला पाठिंबा दिला असला तरी त्यांनी राज्य सरकारचे धोरण हे दुतोंडी असल्याची टीका केली आहे. एकीकडे राज्य सरकार सार्वजनिक पद्धतीने अदानी समूहाला विरोध करते तर दुसरीकडे छुप्या पद्धतीने त्यांना मदत करत असल्याचा आरोप रमेश यांनी केला आहे.