मुंबई – करोनाबाधेने रविवारी मुंबईत एकही मृत्यू झाला नाही. त्या महानगरात करोना संकट दाखल झाल्यानंतर प्रथमच तशाप्रकारची मोठा दिलासा देणारी घडामोड घडली. त्यावर ग्रेट न्युज अशा शब्दांत मुंबई पालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी प्रतिक्रिया दिली.
मुंबईत मागील वर्षी 11 मार्चला पहिला करोनाबाधित आढळला. त्यानंतर सहा दिवसांनी (17 मार्च) त्या महानगरात पहिल्या करोनामृत्यूची नोंद झाली. तेव्हापासून मुंबईत दिवसभरात एकही करोनामृत्यू न होण्याची घडामोड पहिल्यांदाच घडली आहे.
मुंबईत रविवारी नवे 367 करोनाबाधित आढळले. तर, 518 बाधित बरे झाले. आता त्या महानगरात 5 हजार 30 सक्रिय बाधित आहेत. तेथील बाधित बरे होण्याचा दर 97 टक्के आहे. मुंबईतील एकूण प्रौढांपैकी 97 टक्के प्रौढांनी करोनालसींचा पहिला डोस घेतला आहे. तर, 55 टक्के प्रौढांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.