पुणे -“श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट’तर्फे संकष्टी चतुर्थीनिमित्त मंदिरात द्राक्ष महोत्सव साजरा करण्यात आला. काळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी मंदिरातील गाभारा आणि सभामंडप सजला होता. नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम आणि रसायनविरहित दोन हजार किलो द्राक्षांची आरास करण्यात आली.
यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांसह “सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी’चे पदाधिकारी देखील उपस्थित होते. ही द्राक्षे नंतर भाविक, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, ससून रुग्णालयात प्रसाद म्हणून दिली जाणार आहेत.
द्राक्षाच्या हंगामात सलग दुसऱ्या वर्षी अशा पद्धतीची आरास मंदिरात केली गेली. दगडूशेठ गणपती मंदिराच्या गाभाऱ्यात संपूर्ण सभामंडपात केलेली ही आकर्षक आरास पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. द्राक्ष शेती सध्या संकटाच्या काळातून जात आहे. या संकटातून बाहेर पडण्याची जिद्द शेतकऱ्यांनी बाळगली आहे. विघ्नहर्त्या गणेशाला यानिमित्त शेतकऱ्यांची घातले ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी सांगितले.
आरोग्यासाठी द्राक्ष महत्त्वाचे
प्राचीन भारतीय आयुर्वेदात द्राक्षांचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व मोठे आहे. द्राक्षांमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि “क’ जीवनसत्त्वाचे चांगले स्त्रोत आहेत. द्राक्षे हृदयविकाराचा धोका कमी करतात. त्याच्या सेवनाने मेंदूवर वयाचा कमी परिणाम होतो. द्राक्षांमध्ये असलेल्या फायबरमुळे आतड्याची हालचाल सुलभ होते. शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. त्यामुळे द्राक्षांचे सेवन करणे हे आरोग्यदृष्ट्या उपयुक्त असल्याने अनाथाश्रम, वृद्धाश्रम आणि ससून रुग्णालयात द्राक्षांचे प्रसादरुपी वाटप करण्यात येणार आहे असे रासने म्हणाले.