बुध – लॉकडाऊनच्या काळात आपला गाव त्यांना परका झाल्यासारखा होता. प्रादुर्भावाच्या भीतीने गावाकडे येणाऱ्या नागरिकांना गावबदी केली गेली. याच हाकलून दिलेल्या नागरिकांची आठवण ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने येत असल्याने एकेक मतासाठी आता त्यांनाच पायघड्या घातल्या जात आहेत.
करोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊन काळात पोटापाण्यासाठी बाहेरगावी गेलेले नागरिकांनी कुटुंबीयांच्या सुरक्षिततेच्या काळजीने आपल्या गावाची वाट धरली. परंतु, त्यांना गावातील नागरिकांनी गावाच्या वेशी व रस्ते अडवल्याचा कटू अनुभवास सामोरे जावे लागले. गावातील प्रवेशाकरिता गावकऱ्यांसमोर हात पसरूनदेखील त्यांच्या याचनेची कोणी दखल घ्यायला तयार नव्हते. इतकेच काय पोलीसांना पाचारण करण्याच्या धमकीवजा भाषेचा वापर करण्यात आला.
करोनापासून जीव वाचवण्यासाठी आपल्या गावात मोठ्या अपेक्षेने परतणाऱ्या नागरिकांना गावबंदी करण्यात आली. ग्रामपंचायत निवडणुकीत नशिब आजवणारे उमेदवार सध्या एकेक मतांची जुळवाजुळव करत आहेत. त्यामुळे बाहेरगावी गेलेल्या मतदारांना व त्यांच्या मतांना महत्व आले आहे.
यासाठी कोण कुठे राहत आहे, किती जणांचे मतदान आपणास मिळेल याचे नियोजन करण्यावर भर दिला जात असल्याचे दिसत आहे. त्यासाठी त्यांच्या वाहतुकीचा खर्चासह विविध प्रलोभन दाखवले जात आहे.
तालुक्यातील नागरिक मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबादसह इतरत्र शहरात नोकरी व्यवसायासाठी गेले आहेत. अचानक करोनामुळे शहरी भागातील या नागरिकांना गावाची आठवण झाली.
कुटुंबांना घेऊन ते गावाकडे आले. परंतु, करोनाच्या भीतीने हादरून गेलेल्या गावकऱ्यांनी बाहेरच्या लोकांना गाव प्रवेशबंदी केली. रात्री अपरात्री तरुणांनी गावाबाहेर खडा पहारा देऊन शहरातून येणाऱ्या लोढ्यांना गावाबाहेर थोपवले. आता ग्रामपंचायत निवडणुकीत याच पाहुण्यांचे महत्त्व वाढले आहे.
ज्यांनी गावबंदी केली, आता तेच मतांसाठी “इलेक्शनला गावाकडे या,’ म्हणून पायघड्या घालत आहेत. खटाव तालुक्यातील 90 गावांच्या निवडणुकीचा धमाका सुरू झाला आहे. गावातील 12 ते 13 टक्के मतदार पुण्या- मुंबईसह इतर ठिकाणी उदरनिर्वाहासाठी गेले आहेत. मात्र, त्यांची नावे गावातील मतदारयादीत असल्याने या बाहेरच्या पाहुण्याना आता भलतेच महत्व आले आहे.
लॉकडाऊन संपले, करोनाचे सावटही कमी झाले. मात्र, गावबंदीच्या मनाला झालेल्या जखमा, बाहेरच्या पाहुण्याच्या मनात कायम राहिल्या. तालुक्यात यावेळी सर्वच गावातील निवडणुका अटीतटीच्या होणार असल्याने आणि त्यातच गावातील 13 टक्के मतदार बाहेर असल्याने एकेका मताला मोठे महत्व आले आहे. यानिमित्ताने गावगाड्याच्या घडामोडीने भलताच वेग घेतल्याचे दिसत आहे.
आली रे आली, माझी बारी आली
लॉकडाऊन काळात खटाव तालुक्यातील बहुतेक गावांच्या वेशी, गावाचे रस्ते बंद करण्यात आले होते. गावातीलच पण बाहेर स्थायिक झालेल्या पाहुण्यांसाठी वेशीचे दार काही ठिकाणी पत्रे लावून गाव बंद केले होते. गावात येणाऱ्या रस्त्यांवर दगड, मुरूम टाकून रस्ते बंद केले होते. आता याच पाहुण्यांना गावात येण्यासाठी विनवण्या केल्या जात आहेत.
लॉकडाऊनदरम्यान गावकऱ्यांनी रोखलेला प्रवेश काही जण विसरलेले नाही. “आता आली रे आली, माझी बारी आली,’ असे म्हणत मतदानासाठी यायचे की नाही याचा विचार काही जण करीत आहेत.