नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी आज केंद्र सरकारवर अदानी समुहाच्या हिंडेनबर्गच्या अहवालासंदर्भात समिती नेमण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या उत्तरावर जोरदार टीका केली. हे करण्यापेक्षा सरकार या प्रकरणाच्या जेपीसी म्हणजेच संयुक्त संसदीय चौकशीला का तयार नाहीं असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. ते पुढे म्हणाले की, अदानींच्या गैरकृत्यांना विरोध करणाऱ्यांना भारतविरोधी म्हणून रंगवण्याचा सरकारचा उद्देश आहे.
मोदी सरकारने सुप्रीम कोर्टात एका समितीला का होकार दिला हे स्पष्ट आहे. पण या समितीचा अदानीशी कमी आणि हिंडेनबर्गचा पर्दाफाश करण्याशी जास्त संबंध आहे, असे ट्विट जयराम रमेश यांनी केले आहे. याआधी काल केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला कळवले की सेबी परिस्थिती हाताळण्यास सक्षम आहे आणि अदानी समूहावरील हिंडेनबर्गच्या अहवालानंतर गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी समिती स्थापन करण्यास आमची तयारी आहे. त्यावर जयराम रमेश यांनी ही प्रतिक्रीया दिली आहे.