हरिद्वार – येथील कारागृहात असलेला कुख्यात गुंड सुनील राठी याने हरिद्वारच्या कानखल येथे राहणाऱ्या व्यावसायिकाला 50 लाख रुपयांची खंडणी मागितली आहे. राठी याने व्हॉट्सऍपवर फोन करून पैसे न मिळाल्यास पाच जणांचा गट त्याचा रोशनाबाद येथील भूखंड ताब्यात घेईल, अशी धमकी दिल्याचे उघड झाले आहे.
याआधीही राठीच्या टोळ्यांनी व्यापारी आणि त्याच्या भावाला शस्त्रांचा धाक दाखवून धमकावले आहे. त्यामुळे कुख्यात सुनील राठी आणि त्याच्या पाच हस्तकांविरुद्ध सिडकुल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे एसपी सिटी स्वतंत्र कुमार सिंह यांनी सांगितले.
अनेक वर्षांपूर्वी कुख्यात सुनील राठीला उत्तराखंडच्या तुरुंगातून उत्तर प्रदेशच्या तुरुंगात हलवण्यात आले होते. 2018 पर्यंत राठी बागपत तुरुंगात बंद होता. 2018 मध्ये, अन्सारी टोळीचा बदमाश आणि पूर्व उत्तर प्रदेशातील माफिया डॉन प्रेमप्रकाश उर्फ मुन्ना बजरंगी याची तुरुंगात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.
ज्या दिवशी मुन्ना बजरंगीला तुरुंगात हलवण्यात आले, त्याच दिवशी त्याची हत्या करण्यात आली. कुख्यात सुनील राठीने स्वतः मुन्ना बजरंगीच्या हत्येचा आरोप स्वीकारला होता. यानंतर राठीला बागपत येथून दुसऱ्या तुरुंगात हलवण्यात आले. त्यानंतर दिल्लीतील तिहार तुरुंगात रवानगी करण्यात आली. त्यानंतर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्याला पुन्हा हरिद्वार कारागृहात आणण्यात आले होते.
कारागृहात राठीकडे फोन आणि इंटरनेट सुविधा आली कोठून याचा शोध पोलिस घेत असून, याप्रकरणी जबाबदार पोलिस कर्मचारी असतील तर त्यांना बडतर्फ केले जाईल, असे जिल्हा पोलिस अधिक्षकांनी सांगितले आहे.