कॉंग्रेस नेते मिलिंद देवरा यांचे वक्तव्य
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळालेल्या भाजपाला राज्यपालांनी सरकार स्थापण करण्याचे निमंत्रण दिले आहे. शिवसेनाशिवाय 105 आमदारांसोबत असलेल्या भाजपाला बहुमत मिळवण्यासाठी करण्यासाठी 145 चा आकडा पार करावा लागणार आहे. अशावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी एकत्र येऊन सत्ता स्थापन करु शकते आणि कॉंग्रेस त्यांना बाहेरुन पाठींबा देईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. कॉंग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी देखील महत्त्वाचे विधान केले आहे.
राज्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन सरकार स्थापन करावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. दोन्ही पक्षांचे आमदार मिळून बहुमत मिळणार नाही, यावर देखील त्यांना प्रश्न विचारण्यात आला. महाराष्ट्राच्या राज्यपालांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्तास्थापनेचे निमंत्रण द्यायला हवे. कारण भाजपा-शिवसेनेने एकत्र सत्ता स्थापन करण्याचे नाकारले आहे. अशावेळी एनसीपी आणि कॉंग्रेस राज्यात दुसरी मोठी आघाडी असल्याचे ते म्हणाले.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्तास्थापनेचे आमंत्रण दिले आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेला भाजप देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली सरकार स्थापनेचा दावा करेल. यानंतर भाजप सरकारला सभागृहात बहुमत सिद्ध करावे लागेल. दरम्यान भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कॉंग्रेसच्या राज्यातील ज्येष्ठ नेत्यांबरोबरच केंद्र पातळीवरील नेतेही आग्रही आहेत. यासाठी समोर येणारा दुसरा पर्याय स्वीकारण्यास हे नेते सकारात्मक आहेत. कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींशी जवळीक असलेले राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनीही तसे स्पष्ट संकेत दिले आहेत.