मुंबई – खुद्द हिंदी भाषिकांपेक्षा महाराष्ट्र व गुजरात या राज्यांनी हिंदी भाषेच्या प्रचार व प्रसाराचे फार मोठे कार्य केले आहे. आज हिंदी भाषा सुरीनाम, मॉरीशस, फिजी यांसह अनेक देशात बोलली व समजली जाते.
त्यामुळे हिंदी एक आंतरराष्ट्रीय भाषा आहे असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. हिंदी भाषेतील प्रसिध्द हास्य-व्यंग लेखकांच्या लेखांचे संकलन असलेल्या “बता दूँ क्या’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते मंगळवारी राजभवन येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते.
हास्य व्यंग लिखाण हे एखाद्या टॉनिक प्रमाणे असून ते हलकेच आनंद देताना वाचकांना अंतर्मुख करते. देशातील सर्व भाषा एकमेकांच्या भगिनी असून हिंदी भाषिकांनी मराठी भाषेचे ज्ञान प्राप्त करावे, अशीही सूचना राज्यपालांनी यावेळी केली.
ज्येष्ठ पत्रकार डॉ. वागीश सारस्वत तसेच संपादक डॉ. प्रमोद पांडेय यांनी पुस्तकाची भूमिका स्पष्ट केली. कवयित्री आभा सूचक यांनी हिंदी अकादमी, मुंबईच्या कार्याची माहिती दिली. आर. के. पब्लिकेशनतर्फे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.