मुंबई – भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय राजकारणावर अंगभूत बुद्धिमत्ता, कार्यकुशलता, संघटन कौशल्य, प्रशासकीय व संसदीय कार्य अनुभव आणि राजनैतिक द्रष्टेपणाची अमिट छाप सोडणाऱ्या निवडक राजकारण्यांमध्ये प्रणव मुखर्जी यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.
गेल्या पाच दशकांमध्ये प्रणव मुखर्जी यांनी अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, सभागृह नेते आणि भारताचे राष्ट्रपती यांसह विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडताना त्या त्या पदांची उंची वाढविली. जवळजवळ चार दशके सातत्याने संसदेचे सदस्य असलेल्या प्रणव मुखर्जी यांनी देशातील संसदीय लोकशाही सुदृढ करण्यासाठी असाधारण असे योगदान दिले. त्यांच्या निधनामुळे देशाने संसदीय राजकारणातील भीष्म पितामह गमावले आहेत.
भारतमातेच्या या थोर सुपुत्राला मी आपली श्रद्धांजली वाहतो तसेच आपल्या शोक संवेदना त्यांच्या कुटुंबियांना कळवितो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे.