नवी दिल्ली -भारतीय न्याययंत्रणेतील भीष्म पितामह म्हणून ओळखले जाणारे दिग्गज विधिज्ञ फली एस.नरिमन यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पुत्र आणि सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश रोहिंटन नरिमन, कन्या आणि सून असा परिवार आहे.
नरिमन यांचा जन्म १० जानेवारी १९२९ यादिवशी संपन्न पारशी कुटूंबात रंगून (आता यांगून) येथे झाला. ते १२ वर्षांचे असताना त्यांचे कुटूंबीय जपानच्या आक्रमणामुळे भारतात दाखल झाले. नोव्हेंबर १९५० मध्ये नरिमन यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली सुरू केली.
त्यांना १९६१ मध्ये वरिष्ठ वकील म्हणून दर्जा मिळाला. त्यानंतर १९७२ पासून त्यांचा सर्वोच्च न्यायालयातील वकिलीचा प्रवास सुरू झाला. त्यांनी तब्बल ७ दशके वकिली केली.
त्यांची मे १९७२ मध्ये देशाचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी १९७५ मध्ये आणीबाणी लागू झाल्याच्या पुढच्याच दिवशी त्या पदाचा राजीनामा दिला.
विधी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल नरिमन यांना १९९१ मध्ये पद्मभुषणने गौरवण्यात आले. त्यानंतर २००७ मध्ये त्यांना पद्मविभुषण सन्मान जाहीर झाला. त्यांची १९९९ मध्ये राज्यसभेवर नियुक्ती झाली.
नागरिकांच्या हक्कांचे रक्षण, लोकशाहीचे जतन आदींसाठी महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक ठरलेल्या काही खटल्यांच्या कामकाजात त्यांचा सहभाग होता. त्या खटल्यांमध्ये गोलकनाथ, केशवानंद भारती प्रकरणांचा समावेश आहे.