भारतरत्न आणि भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची मृत्यूशी असणारी झुंज अखेर संपली आहे. अत्यंत अभ्यासू, मवाळ, सर्वांना सोबत घेऊन जाणारे व्यक्तिमत्त्व म्हणून भारतीय राजकारणात त्यांची नोंद केली जाईल. भारतीय राज्यघटनेचे अभ्यासक आणि घटनेवर अढळ श्रद्धा ठेवून त्या चौकटीतच काम करणारे नेते म्हणून प्रणव मुखर्जी चिरकाल भारतीयांच्या स्मरणात राहतील.
प्रणव मुखर्जी हे आपल्या राजकीय प्रवासात कॉंग्रेस पक्षाशी आणि गांधी घराण्याशी एकनिष्ठ राहिले. शेवटपर्यंत त्यांनी ही एकनिष्ठता जपली. राष्ट्रपती बनण्यापूर्वी त्यांच्यामध्ये असणारी पंतप्रधान बनण्याची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नव्हती. प्रणवदांच्या कारकिर्दीचे वैशिष्ट म्हणजे कॉंग्रेसच्या केंद्रातील सत्ताकाळामध्ये जे भ्रष्टाचाराचे आरोप, टीका झाली त्यापासून ते नेहमीच लांब राहिले. ते भारताच्या आधुनिक इतिहासाचे तसेच कॉंग्रेस पक्षातील घडामोडींचे गाढे अभ्यासक होते.
राष्ट्रपती या नात्याने प्रणवदांनी नेहमीच घटना आणि घटनात्मक मूल्यांचे संरक्षण केले. घटनेतील कोणत्याही तरतुदीबाबत अस्पष्टता असल्यास त्याबाबत स्पष्ट माहिती घेण्यासाठी मुखर्जी यांच्याशी संपर्क केला जात असे, हे त्यांचे वैशिष्ट्य होय. त्यांची विद्वत्ता, व्यासंग आणि ज्ञान अफाट होते. भारताच्या पूर्वीच्या राष्ट्रपतींना वेगवेगळ्या नावाने ओळखण्यात आले. चार पंतप्रधानांसोबत काम करण्याची संधी लाभलेले आर. वेंकटरमण हे स्वतःला “कॉपीबुक’ राष्ट्रपती म्हणत असत.
देशाचे पहिले दलित राष्ट्रपती के. आर. नारायण हे स्वतःला “कृतिशील राष्ट्रपती’ मानत असत. “मिसाइल मॅन’ म्हणून सर्वपरिचित असणारे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी स्वतःला “पीपल्स प्रेसिडेन्ट’ म्हणवून घेतले होते. देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी स्वतःबद्दल भाष्य करताना “सामान्य काळात मित्र आणि तत्त्वचिंतक तर संकटाच्या काळात मार्गदर्शक आणि संरक्षक’ असे म्हटले होते. फखरुद्दीन अली अहमद यांना “रबर स्टॅम्प’ राष्ट्रपती म्हटले गेले तर ज्ञानी झैलसिंग यांना “सक्रिय राष्ट्रपती’ मानले गेले. या पार्श्वभूमीवर प्रणव मुखर्जी यांच्या कार्यकाळाचे विश्लेषण करायचे ठरविल्यास “तांत्रिकदृष्ट्या योग्य आणि सजग तसेच घटनातज्ज्ञ राष्ट्रपती’ असेच म्हटले जाईल.
तेरावे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांनी आपल्या पहिल्याच संबोधनात म्हटले होते की, “आता मला राष्ट्रपती म्हणून घटनेची सुरक्षितता आणि संरक्षण करण्याची जबाबदारी मिळाली आहे आणि मी ती पार पाडेन.’ राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यात बऱ्याच वेळा संघर्षाची वेळ आली आहे. अगदी पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्यातही अनेक विषयांमध्ये मतभेद होते. दोघांचे दृष्टिकोन वेगवेगळे होते. राजेंद्रबाबू रूढीवादी आणि भारतीय परंपरांवर विश्वास असणारे होते तर नेहरू उदारवादी, आधुनिक आणि पाश्चात्य विचारांनी प्रभावित होते. असे मतभेद अनेक राष्ट्रपतींच्या कार्यकाळात दिसले आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ वादविवादांपासून मुक्त राहिला. तरीसुद्धा मुखर्जी यांनी अनेकदा पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्र्यांना प्रश्न विचारले होते. सूचना केल्या होत्या आणि मुख्य म्हणजे सरकारच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिकाही मांडली होती. अर्थात हे सर्व त्यांनी कधीच सार्वजनिक केले नाही.
संसदेला विश्वासात न घेता वारंवार अध्यादेश काढण्याच्या मानसिकतेबद्दल त्यांचा कठोर दृष्टिकोन सर्वांनी पाहिलेला आहे. किंबहुना संसदेला विचारात घ्यावे लागू नये यासाठी अध्यादेशाचा आधार घेतल्यामुळे सरकारबद्दल त्यांनी अनेकदा नाराजीही व्यक्त केली होती. अध्यादेशाचा आधार अगदी विशिष्ट परिस्थितीतच घेतला गेला पाहिजे, असा त्यांचा कटाक्ष होता. 2016 मध्ये एक अध्यादेश त्यांच्यासमोर पाच वेळा आणण्यात आला होता. त्याचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी दरवेळी त्या अध्यादेशावर स्वाक्षरी केली. परंतु नंतर सरकारला लेखी कळविले की, अध्यादेशाला मंजुरी देण्यात येत असली, तरी असे पुन्हा होता कामा नये. एवढेच नव्हे तर वाढत्या असहिष्णुतेच्या मुद्द्यावरूनही मुखर्जी यांनी खुल्या शब्दांत मतप्रदर्शन केले होते.
गोरक्षणाच्या नावाखाली होत असलेल्या राजकारणाचा स्पष्ट संदर्भ त्यांनी दिला होता. भारताच्या बहुलतावादी सिद्धांताचे समर्थन त्यांनी मजबूतपणे केले होते आणि “असहिष्णू लोकांसाठी भारतात जागा असता कामा नये,’ असे स्पष्टपणे मांडले होते. आपल्या कार्यकाळात अनेकदा अशा प्रकारची वक्तव्ये करून मुखर्जी यांनी लोकशाही संस्थांचे आणि बहुलतावादी मूल्यांचे संरक्षण केले. ही मूल्येच भारतीय लोकशाहीची ओळख आहे हे त्यांनी ताकदीने अधोरेखित केले; परंतु सत्तारूढ व्यवस्थेला स्पष्ट संदेश देतानाच त्यांच्याशी संघर्ष मात्र होऊ दिला नाही.
अरुणाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील सरकार बरखास्त करण्यासाठी “कलम 356’चा वापर करण्याच्या विषयावर ते केंद्र सरकारला सवाल करतील असे सर्वांना वाटले होते. परंतु त्यांनी तसे केले नाही. वस्तुतः राष्ट्रपतीही चुकीचा निर्णय घेऊ शकतात, असे उत्तराखंड उच्च न्यायालयानेही म्हटले होते. परंतु मुखर्जी यांनी मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच मार्गक्रमण केले. यावरून कायम घटनेप्रमाणे काम करणारे राष्ट्रपती असेच त्यांच्या बाबतीत म्हणावे लागते. घटनेला त्यांच्या हृदयात सर्वोच्च स्थान राहिले आणि घटनेच्या सर्व तरतुदींचे पालन ते नेहमी करीत राहिले. वेळ पडताच त्यांनी केंद्र सरकारला उचित सल्ले दिले, सरकारला कर्तव्यांची आठवणही करून दिली; परंतु घटनेने राष्ट्रपतींना अधिकारांची जी चौकट आखून दिली आहे, तिचे त्यांनी कधीच उल्लंघन केले नाही.
अधिकारांच्या कक्षा ओलांडताना मुखर्जी कधीच दिसले नाहीत. एखाद्या विषयावर त्यांनी कधीच अतिसक्रियता दाखविली नाही किंवा निष्क्रियही राहिले नाहीत. त्यामुळेच घटनेचा सन्मान राखून त्याबरहुकूम काम करणारे राष्ट्रपती असेच त्यांच्या बाबतीत म्हणावे लागेल. त्यांच्या जीवनप्रवासाविषयी, कारकिर्दीविषयी, राजकारणातील निर्णयांविषयी, वादप्रवादांविषयी बरीच चर्चा होत राहील. परंतु राष्ट्रपतीपदाची कारकीर्द संपल्यानंतर आपल्या संसदीय कार्यकाळातील सर्व चढउतारांचा आढावा मुखर्जी यांनी केलेले भाषण आज त्यांच्या निधनानंतर विचारात घ्यायला हवे. या भाषणात त्यांनी आपल्याला सभागृहात जे शिक्षण मिळाले, त्याबद्दल लोकप्रतिनिधींना माहिती दिली होती. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्यापासून भाजपचे अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवानी, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा सर्वच नेत्यांचा त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला तसेच वेगवेगळ्या संदर्भांमध्ये काही गोष्टी शिकण्याची गरज व्यक्त केली होती.
संसदेच्या सभागृहांमध्ये होणारा कालापव्यय आणि गोंधळ याबद्दल एक वरिष्ठ नेते आणि देशाचे प्रथम नागरिक या नात्याने त्यांनी त्यावेळी व्यक्त केलेली चिंता गांभीर्याने घ्यायला हवी. पूर्वीच्या काळी संसदेत ज्या गांभीर्याने विचारविनिमय होत असे, त्या काळाची आठवण त्यांनी सर्वांना करून दिली होती. त्यांनी नेहमीच तत्कालीन विषयांपेक्षा परंपरांच्या रक्षणाला अधिक महत्त्व दिले. परंतु परंपरांचे जतन करताना त्यांनी टोकदारपणा टाळला. राज्यघटनेची प्रतिष्ठा आणि गौरवाचे रक्षण करणे हे संसदसदस्यांचे सर्वांत मोठे कर्तव्य आहे, ही बाब ते नेहमी मांडत असत आणि त्यानुसारच त्यांचे आचरण अखेरपर्यंत राहिले.