जयपूर – देशामध्ये खरोखरच सत्तांतर घडवून आणायला हवे आहे, असे जर काँग्रेसला वाटत असेल, तर त्या पक्षाने राहुल गांधी आणि गांधी कुटुंबाच्या पलीकडे जाऊन विचार करायला हवा. तरच काही सन्माननीय पर्याय पक्षाला सापडतील, अशा शब्दांत लेखिका शर्मिष्ठा मुखर्जी यांनी काॅंग्रेसला हितोपदेश दिला आहे. शर्मिष्ठा मुखर्जी या दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कन्या असून त्यांच्या ‘प्रणव- माय फादर : अ डाॅटर रिमेंबर्स‘ या पुस्तकावर जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये चर्चा करताना शर्मिष्ठा बोलत होत्या.
यावेळी शर्मिष्ठा मुखर्जी यांनी सांगितले की, या पुस्तकात राहुल गांधींवर केली टीका ही काँग्रेसवर केलेली टीका नाही. माझ्या वडिलांच्या इंदिरा गांधी, मनमोहन सिंग, सोनिया गांधी यांच्याशी असलेल्या चांगल्या संबंधांचा उल्लेख माझ्या पुस्तकात आहे. ते सगळे काँग्रेसचे नाहीत का? प्रणव मुखर्जी हे इंदिरा गांधींचे आंधळे भक्त होते. इंदिरा गांधींना विचारून ते कपडे घालायचे. आयुष्याच्या शेवटच्या दिवसात काँग्रेसमधील परिस्थितीमुळे ते हैराण झाले होते.
मीही काँग्रेसवासी आहे आणि सध्याच्या परिस्थितीमुळे मी त्रस्त आहे. ही केवळ माझी स्थिती नाही, तर काँग्रेसच्या प्रत्येक नेत्याच्या मनाची अवस्था आहे. माझ्या भाजपमध्ये प्रवेश झाल्याची चर्चा निव्वळ अफवा आहे. मी राजकारणातून निवृत्ती घेतली आहे. कोणत्याही राजकीय पक्षाचा भाग बनण्याचा माझा कोणताही हेतू नाही, पण मी काँग्रेसची कट्टर समर्थक आहे.
शर्मिष्ठा मुखर्जी म्हणाल्या की, माझे वडील असते तर ते काँग्रेसच्या सध्याच्या स्थितीवर खूप नाराज झाले असते. ही केवळ त्यांचीच नाही तर काँग्रेसच्या प्रत्येक नेत्याची मन:स्थिती आहे. मी स्वतः कट्टर काँग्रेसी आहे. मीही सध्याच्या परिस्थितीमुळे अस्वस्थ आहे. शर्मिष्ठा मुखर्जी यांनी सांगितले की, जेव्हा माझ्या वडिलांनी नागपुरात आरएसएसच्या कार्यक्रमाला जायचे ठरवले होते तेव्हा मला खूप राग आला होता पण त्यानंतर लोकशाहीत संवादाला फार महत्त्व असते, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांचा प्रत्येक पक्षाशी चांगला संबंध होता.
त्यांनी आपली विचारधारा मांडण्यासाठी आरएसएसच्या व्यासपीठाचा वापर केला. तिथे त्यांनी नेहरूंच्या विचारांबद्दल सांगितले. धर्मनिरपेक्षतेबद्दल बोलले. ते म्हणाले की, प्रणव यांना पंतप्रधान व्हायचे होते, पण पंतप्रधान होऊ शकले नाही, त्यांना अवघड वाटले. त्यामुळे राष्ट्रपती होण्याची संधी आल्यावर त्यांनी ती संधी सोडणे प्रशस्त मानले नाही.